शिर्डी | प्रतिनिधी
श्रीरामपूर शहरात चर्चेत असलेल्या बेग बंधूंच्या नावावर आणखी एक गंभीर गुन्हा नोंद झाल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. २२ जुलैच्या मध्यरात्री शिर्डी शहर पोलीस ठाण्यात एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून बाबू साळवे, यांच्याविरुद्ध बलात्कार, सागर बेग आणि सोनू बेग यांच्यावर पिस्तुलाचा धाक दाखवून धमकी देणे, तसेच आर्म्स ॲक्टअंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
फिर्यादी महिलेने आपल्या तक्रारीत अत्यंत धक्कादायक घटनाक्रम मांडला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, जानेवारी २०२६ मध्ये ती आपल्या दोन मुलांसह श्रीरामपूर येथे आजीकडे राहत असताना बाबू साळवे हा तिच्या मागे लागला. सुरुवातीला मैत्री करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने स्पष्ट नकार दिल्यानंतर “मी सागर बेग आणि सोनू बेग यांचा माणूस आहे, माझे कोणीच काहीही बिघडणार नाही,” असे सांगत धमकावण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे.
त्यानंतर बाबू साळवेने वारंवार फोन करून भेटण्याचा तगादा लावला. अखेर एका दिवशी श्रीरामपूरमधील वार्ड क्रमांक ३ मधील एका खोलीत बोलावून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
सागर बेग आणि सोनू बेग “बाबू आमचा माणूस आहे…” म्हणत पिस्तुलाचा धाक
फिर्यादीनुसार, काही दिवसांनी पुन्हा त्याच खोलीत नेण्यात आले. तेथे सागर बेग, सोनू बेग आणि बाबू साळवे उपस्थित होते. तिघांनी पिस्तूल दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. “बाबू आमचा माणूस आहे, त्याच्यासोबत संबंध ठेव, नाहीतर परिणाम वाईट होतील,” असे धमकावल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.
या घटनेनंतर भीतीमुळे ती श्रीरामपूर सोडून कोपरगाव येथे राहायला गेली. मात्र, तेथूनही बाबू साळवे फोन करून धमक्या देत असल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे.
मैत्रिणीलाही मारहाण झाल्याचा आरोप
२५ जून रोजी एका मैत्रिणीच्या कार्यक्रमासाठी ती पुन्हा श्रीरामपूरला आली असता बाबू साळवे अचानक तेथे आला. त्याने पीडित महिलेसह तिच्या मैत्रिणीलाही मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
अखेर सततच्या कथित धमक्या, अत्याचार आणि मानसिक छळाला कंटाळून पीडित महिला आपल्या आईसह २२ जुलैच्या मध्यरात्री शिर्डी शहर पोलीस ठाण्यात पोहोचली. तिच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
शिर्डीत FIR, तपास श्रीरामपूरकडे वर्ग
घटनास्थळ श्रीरामपूर परिसरातील असल्याने प्राथमिक गुन्हा शिर्डी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी प्रकरण श्रीरामपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी श्रीरामपूर येथे “तक्रार निवारण दिन” आयोजित करून नागरिकांच्या तक्रारी ऐकल्या होत्या. त्यानंतर एवढ्या गंभीर स्वरूपाची तक्रार दुसऱ्या पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे.
पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष
या प्रकरणातील आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याने आता पोलीस तपासातून नेमके सत्य काय समोर येते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. फिर्यादीने केलेल्या आरोपांची पडताळणी, तांत्रिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि इतर तपासाच्या आधारे पुढील कारवाई होणार आहे.
गंभीर गुन्हा, पण अधिकृत माहिती नाही; पोलिसांच्या कमालीच्या गुप्ततेमुळे चर्चांना उधाण
शिर्डी शहर पोलीस ठाण्यात या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद झाल्यानंतरही त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा प्रसिद्धीपत्रक प्रसारमाध्यमांना देण्यात आले नसल्याने पत्रकार आणि नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.
स्थानिक पत्रकारांनी शिर्डी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच गुन्ह्याच्या नोंदीशी संबंधित पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रकरणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध करून देण्यात आली नाही
दरम्यान, आरोपी सागर बेग याने पूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता, अशी माहिती सार्वजनिकरीत्या उपलब्ध छायाचित्रे आणि कार्यक्रमांच्या आधारे चर्चेत आहे. तथापि, या प्रकरणाच्या तपासाशी त्या राजकीय संबंधांचा कोणताही संबंध असल्याचे अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही.
गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही अधिकृत माहिती न देण्यामागे नेमके कारण काय, याबाबत पत्रकार आणि नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलीस प्रशासनाने या प्रकरणात अधिकृत भूमिका स्पष्ट करून तपासाबाबत आवश्यक माहिती जाहीर करावी, अशी मागणीही व्यक्त होत आहे.
पीडितेची ओळख गोपनीय ठेवणे बंधनकारक; मग प्राथमिक माहिती देण्यास टाळाटाळ का?
बलात्कारासारख्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये पीडित महिलेची ओळख गोपनीय ठेवणे हे कायदेशीर बंधनकारक आहे. त्यामुळे FIR किंवा इतर कागदपत्रांमधील महिलेचे नाव, पत्ता किंवा ओळख उघड करणारी माहिती प्रसारमाध्यमांना देण्यास निर्बंध आहेत.
मात्र, कायद्याचे पालन करत पीडितेची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवून गुन्हा दाखल झाल्याची प्राथमिक माहिती, लागू केलेली कलमे, आरोपींची नावे (जिथे कायदेशीरदृष्ट्या योग्य असेल) आणि तपासाची माहिती प्रसारमाध्यमांना देण्याची पद्धत अनेक ठिकाणी अवलंबली जाते.
याच पार्श्वभूमीवर शिर्डी शहर पोलीस ठाण्यात इतक्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही कोणतीही अधिकृत प्राथमिक माहिती देण्यात आली नाही,
अधिकृत पत्रकारितेचे भान राखणारी प्रसारमाध्यमे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे आणि कायद्याचे पालन करून पीडितेची ओळख कधीही जाहीर करत नाहीत. त्यामुळे “पीडितेची गोपनीयता राखणे” आणि “गुन्हा दाखल झाल्याची अधिकृत माहिती देणे” या दोन वेगळ्या बाबी आहेत, असे अनेक पत्रकारांचे मत आहे.
यामुळे या प्रकरणात माहिती देण्यास विलंब किंवा नकार का देण्यात आला, याबाबत पोलीस प्रशासनाने अधिकृत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी पत्रकार आणि नागरिकांकडून केली जात आहे. अधिकृत माहितीअभावी विविध तर्क-वितर्कांना वाव मिळत असून, ते टाळण्यासाठी प्रशासनाने पारदर्शक भूमिका मांडणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.
माहिती दडपली जात असल्याचा आभास का निर्माण झाला?
या गंभीर गुन्ह्याची अधिकृत माहिती प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवण्यामागे नेमके कारण काय? ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया आहे की अन्य काही कारण आहे, असा प्रश्न पत्रकार आणि नागरिक उपस्थित करत आहेत.
गंभीर गुन्ह्याची माहिती दडपली जात असल्याचा आभास निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने अधिकृत भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. अन्यथा पारदर्शकतेबाबत अनावश्यक प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.
पोलीस प्रशासनाने या प्रकरणात वस्तुस्थिती स्पष्ट करणारे अधिकृत निवेदन जारी केल्यास सर्व शंका आणि तर्क-वितर्कांना पूर्णविराम मिळू शकतो. नाहीतर हि माहिती पोलीस यंत्रणा दाबत आहे असा समज होईल

