
शिर्डी : श्री साईबाबांच्या पावन भूमीत आज पुन्हा एकदा माणुसकी आणि प्रामाणिकपणाचे दर्शन घडले. श्री साईबाबा संस्थानच्या माहिती तंत्रज्ञान विभागातील कर्मचारी श्री. सागर ब्राम्हणे हे मंदिराकडून प्रसादालयाकडे जात असताना रस्त्यावर त्यांना सॅमसंग एस-२० अल्ट्रा हा महागडा मोबाईल आढळून आला. कोणताही मोह न ठेवता त्यांनी तो मोबाईल तात्काळ संरक्षण कार्यालयात आणून जमा केला.
मोबाईलच्या पाठीमागे असलेल्या लॉकर डिपॉझिटच्या पावतीवर एक मोबाईल क्रमांक नमूद होता. त्या क्रमांकावर संपर्क साधला असता सदर मोबाईल हा भोपाल येथील साईभक्त आदित्य श्रीवास्तव यांचा असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना संरक्षण कार्यालयात बोलावून संस्थान कर्मचारी श्री. सागर ब्राम्हणे यांच्या हस्ते त्यांचा मोबाईल सुरक्षितपणे परत करण्यात आला.
मोबाईल परत मिळाल्यानंतर आदित्य श्रीवास्तव यांनी भावूक होत सांगितले की, “माझ्या मोबाईलची किंमत सुमारे एक लाख रुपये आहे. मोबाईल हरवल्यानंतर तो पुन्हा मिळेल, अशी मला अजिबात अपेक्षा नव्हती. मात्र शिर्डीत माणुसकी आणि प्रामाणिकपणा अजूनही जिवंत आहे. शिर्डीव्यतिरिक्त असा अनुभव अन्यत्र मिळणे कठीण आहे.”
आपल्यासोबत घडलेली ही घटना त्यांनी आपल्या नातेवाईकांना ग्रुप व्हिडीओ कॉलद्वारे सांगितली. संस्थान कर्मचारी श्री. सागर ब्राम्हणे यांच्या प्रामाणिकपणाचे त्यांनी मनापासून कौतुक केले.
मोबाईल परत मिळाल्याच्या आनंदापोटी आदित्य श्रीवास्तव यांनी श्री. सागर ब्राम्हणे यांना छोटीशी परतभेट देण्याचा प्रयत्न केला. मात्र श्री. ब्राम्हणे यांनी ती भेट नम्रपणे नाकारत कर्तव्य आणि प्रामाणिकपणाला कोणत्याही मोबदल्याची गरज नसते, असा आदर्श घालून दिला. अखेर साईभक्ताने ती रक्कम श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात अर्पण केली.
साईबाबांच्या दरबारात हरवलेली मौल्यवान वस्तू परत मिळण्याच्या या घटनेतून “प्रामाणिकपणा हाच खरा साईसेवा” हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.