राहाता (प्रतिनिधी) : राहाता येथील समता पतसंस्थेच्या शाखेत कथित बनावट खाती उघडून आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, या प्रकरणात तत्कालीन शाखा व्यवस्थापक मिलिंद बनकर तसेच पतसंस्थेचे अध्यक्ष काका कोयटे यांनाही अटक करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी विविध स्तरातून होत आहे.
या प्रकरणात आधीच आरोपी अशोक उर्फ कॅप्टन खरात याच्यावर कारवाई सुरू असताना, त्या काळातील शाखेच्या कारभाराची जबाबदारी व्यवस्थापकांवर होती. त्यामुळे शाखेत उघडण्यात आलेल्या कथित बनावट खात्यांबाबत तसेच संबंधित कागदपत्रांच्या वापराबाबत तत्कालीन व्यवस्थापकांची भूमिकाही तपासली जावी, अशी मागणी व्यक्त होत आहे.

काही नागरिक व माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, “प्राथमिक चौकशीवर वेळ न दवडता संबंधित जबाबदार व्यक्तींवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी. पुरावे नष्ट होण्याची शक्यता टाळण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे,” असे मत व्यक्त केले.
दरम्यान, या कथित गैरव्यवहारामुळे पतसंस्थेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ठेवीदारांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
पोलीस व संबंधित तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, तपासातून समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
