शिर्डी | प्रतिनिधी
गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत आणि कायद्याच्या चौकटीत साजरा करा; नियमांचे उल्लंघन केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा शिर्डी पोलिसांनी गणेश मंडळांना दिला आहे.
शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश मंडळांची बैठक घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळांना विविध सूचना दिल्या.
गणेश मंडळांनी उत्सवासाठी आवश्यक त्या परवानग्या घेणे, विद्युत जोडणी अधिकृत पद्धतीने घेणे तसेच मीटरची व्यवस्था करणे बंधनकारक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
रात्री १० नंतर आवाज केला तर कारवाई!
गणेशोत्सवातील ध्वनिक्षेपक आणि साऊंड सिस्टीमबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ठरलेल्या मर्यादेपेक्षा अधिक आवाज केला तर १०० टक्के कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला.
गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, गौरीपूजनाच्या दिवशी, विसर्जनाच्या दिवशी तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत, तर इतर दिवशी रात्री १० वाजेपर्यंतच ध्वनिक्षेपकाला परवानगी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
गुन्हेगारांना मंडळात थारा नको!
गणेश मंडळांनी आपल्या मंडळात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना सहभागी करून घेऊ नये, तसेच अशा व्यक्तींच्या हस्ते कोणताही कार्यक्रम अथवा धार्मिक उपक्रम पार पाडू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
आक्षेपार्ह बॅनर, घोषणा आणि रील्सवर करडी नजर
गणेशोत्सवाच्या काळात आक्षेपार्ह बॅनर, आक्षेपार्ह घोषणा अथवा समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर वापरू नये. विशेषतः गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या रील्सपासून मंडळांनी दूर राहावे, असे पोलिसांनी बजावले.
बाहेरून येणाऱ्या व्यक्तींमुळे मंडळांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता असल्याने मंडळांनी सतर्क राहावे आणि कोणताही अनुचित प्रकार घडल्यास स्वतः कायदा हातात न घेता तात्काळ पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
शांतता भंग करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर
मिरवणूक, मंडप परिसर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी अडचण निर्माण झाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. गणेशोत्सव हा उत्साहाचा आणि भक्तीचा सण आहे; मात्र या उत्सवाच्या नावाखाली कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न झाल्यास पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश या बैठकीतून देण्यात आला.
शिर्डी शहरातील गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत आणि कायद्याचे पालन करून पार पाडण्यासाठी सर्व मंडळांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी केले.