शिर्डी | प्रतिनिधी :
तलाठी भरतीतील कथित पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून युवा आमदार रोहित पवार यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. दोन वर्षांपूर्वी आपण तलाठी भरतीमध्ये गैरप्रकार झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता, त्यावेळी आपल्यावर ‘फेक नरेटिव्ह’ पसरवल्याचा आरोप करण्यात आला; मात्र आता याच प्रकरणातील कथित गैरप्रकार समोर आल्याचा दावा रोहित पवार यांनी केला.
रोहित पवार म्हणाले, “तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार झाला, पेपर फुटला हे दोन वर्षांपूर्वी मी सांगत होतो. तेव्हा विखे पाटील म्हणाले होते की रोहित पवार फेक नरेटिव्ह स्प्रेड करत आहेत. माझ्यावर एफआयआर झाले, मी बाहेर आलो. आज ते सिद्ध झाले आहे.”
याच मुद्द्यावरून विखे पाटील यांना सवाल करताना पवार यांनी, “राजीनामा पहिला देता का ते आधी सांगा; मग पवार साहेबांवर बोलण्याचा प्रयत्न करा,” असा थेट इशारा दिला. त्यामुळे तलाठी भरतीच्या कथित गैरप्रकारावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘फेक नरेटिव्ह नाही, आकडे खरे आहेत’
महाराष्ट्रातील उद्योग आणि कंपन्या राज्याबाहेर जात असल्याच्या मुद्द्यावरही रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील अनेक कंपन्या राज्य सोडून बाहेर जात असल्याचे आकडे खरे असल्याचा दावा त्यांनी केला.
“फेक नरेटिव्ह काही नाही. हे आकडे खरे आहेत. महाराष्ट्रामधल्या बऱ्याच कंपन्या महाराष्ट्राला सोडून बाहेर चालू आहेत, जात आहेत,” असे पवार यांनी म्हटले.
या सर्व विषयांवर सरकारसोबत चर्चा करण्याची आपली तयारी असल्याचे सांगतानाच त्यांनी सत्ताधारी नेत्यांच्या धाडसावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “या सगळ्या विषयावर चर्चा करायची असेल तर आम्ही तयार आहोत; पण या सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांमध्ये धाडस आहे का, हे मात्र बघावे लागेल,” असे रोहित पवार यांनी सुनावले.
दरम्यान, तलाठी भरतीतील कथित गैरप्रकाराबाबत रोहित पवार यांनी केलेल्या या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भरती प्रक्रिया, पेपरफुटी, भ्रष्टाचार आणि जबाबदारीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आता विखे पाटील यांच्याकडून या आरोपांना काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.