मुंबई / शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डी परिसरातील बहुचर्चित ग्रो-मोअर फायनान्स आर्थिक फसवणूक प्रकरण आणि शिर्डी मतदारसंघातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक (DGP) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या भेटीत त्यांनी “फरार आरोपींना तात्काळ अटक करा, त्यांची संपूर्ण संपत्ती जप्त करा आणि शेकडो फसवणूकग्रस्तांना न्याय द्या,” अशी ठाम मागणी केली. यावेळी त्यांची कन्या ट्विंकल पिपाडा उपस्थित होत्या.
डॉ. पिपाडा यांनी निवेदनात म्हटले आहे की, “दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून शेतकरी, कामगार, कष्टकरी, लहान व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांची आयुष्यभराची कमाई लाटण्यात आली. अनेकांनी शेती विकली, कर्ज काढले, व्याजाने पैसे उभे केले; पण आज त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.”
निवेदनात भूपेंद्र सावळे याच्यासह भाऊसाहेब थोरात, राजाराम साळवे, अरुण नंदन आणि पूजा गोकुळ पोटींडे यांच्याविरुद्ध विविध गुन्ह्यांमध्ये चार्जशीट दाखल झाल्यानंतरही त्यांना अटक झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे, “चार्जशीट असूनही आरोपी कायद्याच्या आवाक्याबाहेर कसे? त्यांच्यावर कठोर कारवाई का होत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, या प्रकरणात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलीस ठाणे, राहाता पोलीस ठाणे आणि शिर्डी पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल असून शेकडो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा आहे. फसवणुकीमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून काही गुंतवणूकदार मानसिक तणावाखाली जीवन जगत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, मुख्य आरोपीकडून दीड कोटी रुपये घेतल्याच्या आरोपावरून चार पोलिस कर्मचाऱ्यांना २१ जुलै २०२५ रोजी निलंबित करण्यात आले होते, असे निवेदनात नमूद करत, त्या रकमेबाबत कायदेशीर कार्यवाही करून पीडित ठेवीदारांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
डॉ. पिपाडा यांनी पोलिस महासंचालकांकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या:
फरार आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी.
आरोपींची चल-अचल मालमत्ता शोधून कायदेशीर प्रक्रियेनुसार जप्त करण्यात यावी.
फसवणूकग्रस्त गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्यासाठी विशेष यंत्रणा उभारावी.
संपूर्ण प्रकरणाचा उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि वेळबद्ध तपास करावा.
दोषींना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रभावी पाठपुरावा करावा.
याच भेटीत डॉ. पिपाडा यांनी शिर्डीतील वाढती गुन्हेगारी, खून, चेन स्नॅचिंग, दहशतीच्या घटना आणि कायदा-सुव्यवस्थेबाबतही गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट केले की, देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत येतात. अशा परिस्थितीत गुन्हेगारी वाढल्यास साईनगरीच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो. त्यामुळे शिर्डीसाठी विशेष सुरक्षा आराखडा तयार करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी DGP यांच्याकडे केली.
“शिर्डी ही श्रद्धेची नगरी आहे. फसवणूक करणारे आणि गुन्हेगार यांच्यावर कायद्याचा कठोर बडगा उगारून पीडितांना न्याय मिळवून देणे ही यंत्रणांची जबाबदारी आहे,” असे मत डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी व्यक्त केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
