साकुरी (प्रतिनिधी) : गुरुपौर्णिमेच्या पवित्र पर्वावर शिर्डीत लाखो साईभक्त दर्शनासाठी येतात. अनेक जण शेकडो-हजारो किलोमीटरचा प्रवास करून थकलेले असतात. अशा प्रत्येक भक्ताला प्रेमाने, आपुलकीने आणि सन्मानाने पोटभर अन्न मिळावे, या एकाच भावनेतून श्री साई भगवती प्रतिष्ठानने यंदाही सलग तीन दिवस भव्य अन्नदान महायज्ञ आयोजित केला. तब्बल ३५ वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या या सेवायज्ञातून यंदा १० हजारांहून अधिक साईभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वनाथ अय्यर आणि उपाध्यक्ष प्रसाद अय्यर यांच्या सेवाभावी संकल्पनेतून उभी राहिलेली ही परंपरा आज हजारो साईभक्तांसाठी आधार ठरत आहे. सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत प्रेमाने वाढण्यात आलेल्या महाप्रसादात केवळ अन्न नव्हते, तर त्यामध्ये साईसेवेची भक्ती, माणुसकीची ऊब आणि निस्वार्थ प्रेमाची चव होती.

यावेळी बोलताना अध्यक्ष विश्वनाथ अय्यर म्हणाले, “गुरुसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. श्री साईबाबांच्या कृपेने गेली ३५ वर्षे आम्ही हा सेवायज्ञ अखंड सुरू ठेवला आहे. आमच्यासाठी प्रत्येक साईभक्त म्हणजे साक्षात साईबाबांचे रूप आहे. त्यामुळे एकही भक्त उपाशी जाऊ नये, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटावे, हाच आमचा खरा प्रसाद आहे.”
या महायज्ञासाठी प्रतिष्ठानचे ५० हून अधिक सेवेकरी तीन दिवस अहोरात्र कार्यरत होते. घाम गाळत, कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांनी हजारो भाविकांना प्रेमाने महाप्रसाद वाढला. त्यांच्या चेहऱ्यावरील सेवाभाव आणि भक्तांच्या डोळ्यातील समाधान पाहून अनेकांचे मन भरून आले.
उत्तर प्रदेशातून आलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही या उपक्रमाला भेट देत अय्यर परिवाराच्या सेवाभावी कार्याचे मनापासून कौतुक केले. “ही केवळ अन्नदानाची सेवा नाही, तर साईबाबांच्या शिकवणीचा जिवंत संदेश आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
दान करणारे अनेक असतात; पण भक्तांच्या डोळ्यातील भूक ओळखून प्रेमाने ताट वाढणारे हात फारच थोडे असतात. श्री साई भगवती प्रतिष्ठानची ही ३५ वर्षांची अखंड अन्नसेवा म्हणजे साईबाबांच्या ‘सबका मालिक एक’ आणि ‘श्रद्धा-सबुरी’ या संदेशाचे जिवंत दर्शनच आहे.