संगमनेर | प्रतिनिधी

गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत व दर्जेदार उपचार मिळावेत या उद्देशाने राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेलाच काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार संगमनेरमध्ये उघडकीस आला आहे. शहरातील माजी तांबे हॉस्पिटल, सध्याचे मेडीकव्हर हॉस्पिटल येथे योजनेअंतर्गत रुग्णाच्या आईचे ऑपरेशन करून देण्यासाठी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत हॉस्पिटलमधील दोन जबाबदार कर्मचाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणामुळे संगमनेरसह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, शासनाच्या आरोग्य योजनांमध्ये नेमके काय सुरू आहे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, मेडीकव्हर हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे कामकाज पाहणारा सुभाष दगडू धादवड (वय २९) याने तक्रारदारांच्या आईचे ऑपरेशन व उपचार योजनेत करून देण्यासाठी २० हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली. एवढेच नव्हे तर “या पैशांचे कोणतेही बिल मिळणार नाही,” असेही स्पष्टपणे सांगितल्याचा आरोप आहे.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणी पडताळणी केली. या पडताळणीत सुभाष धादवड याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच तक्रारदाराने हॉस्पिटलचे ऑपरेशन मॅनेजर सुजित दामोदर गायकवाड (वय ३४) यांच्याकडे बिलाबाबत विचारणा केली असता त्यांनी “जे ठरलंय त्यात कमी होणार नाही,” असे सांगून लाच मागणीला पाठबळ दिल्याचे समोर आले. त्यामुळे दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ मधील कलम ७-अ आणि १२ अंतर्गत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
विशेष म्हणजे, या प्रकरणात प्रत्यक्ष लाच स्वीकारण्यात आलेली नसली तरी लाचेची मागणी करणे आणि त्या मागणीला प्रोत्साहन देणे हा गंभीर गुन्हा मानून एसीबीने कारवाई केली आहे.
तांबे हॉस्पिटलवर पुन्हा प्रश्नचिन्ह
संगमनेरमध्ये अनेक वर्षे ‘तांबे हॉस्पिटल’ या नावाने परिचित असलेले हे रुग्णालय नंतर मेडीकव्हर हॉस्पिटल या राष्ट्रीय हॉस्पिटल साखळीचा भाग झाले. मात्र आजही स्थानिक नागरिक या रुग्णालयाला तांबे हॉस्पिटल या नावानेच ओळखतात. त्यामुळे या प्रतिष्ठित रुग्णालयाशी संबंधित लाचखोरीच्या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गरीब रुग्णांच्या हक्कांवर घाला?
महात्मा फुले जनआरोग्य योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी जीवनदायी योजना मानली जाते. अशा योजनेत उपचार मिळवण्यासाठी जर पैशांची मागणी होत असेल, तर ही केवळ एका रुग्णाची फसवणूक नसून शासनाच्या कल्याणकारी यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
एसीबीचे नागरिकांना आवाहन
या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छाया देवरे करीत आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना स्पष्ट आवाहन केले आहे की, कोणताही लोकसेवक, शासकीय योजनेशी संबंधित कर्मचारी किंवा अन्य व्यक्ती लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा किंवा जवळच्या एसीबी कार्यालयात तक्रार नोंदवावी. नागरिकांच्या तक्रारी गोपनीय ठेवून तातडीने कारवाई केली जाईल, असेही विभागाने नमूद केले आहे.
