भारतीय लहुजी सेनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिर्डीतील ‘साई आश्रया अनाथालयात’ अत्यंत स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला. लहुजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष समीर वीर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सालाबादप्रमाणे यंदाही अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य, मिष्टान्न भोजन आणि फळांचे वाटप करत अनोख्या पद्धतीने जयंती साजरी केली.

याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, माजी उपनगराध्यक्ष विजयराव कोते, माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर,उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन,नगरसेवक बापू ठाकरे यांसह मान्यवरांनी उपस्थिती लावत प्रतिमेचे पूजन केले व समीर वीर यांच्या वर्षानुवर्षे जयंतीनिमित्त अविरत चालत आलेल्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले
अनाथ मुलांसोबत वेळ घालवताना आणि त्यांना खाऊ-साहित्य वाटप करताना संस्थापक अध्यक्ष समीर वीर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “या चिमुकल्या अनाथ मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून जयंती साजरी करताना मनाला असीम आणि मनस्वी समाधान लाभते,” अशी भावना त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय लहुजी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली. यात भारतीय लहुजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष समीर वीर,प्रशांत बागुल,शिवाजी उमाप ,सोमनाथ आडंगळे ,रोहित वीर ,विकास आडंगळे ,रितेश खरात ,नाजीम पटेल ,सागर अमोलिक ,साई वीर ,साई कांबळे ,आशिष महाडिक ,हिमांशू पटेल
,सिद्धार्थ कुऱ्हाडे
यांसह कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
समाजासाठी आदर्श ठरलेला जयंतीचा उपक्रम
“डीजे नाही… मिरवणूक नाही… फटाक्यांची आतषबाजी नाही… अनाथ मुलांच्या चेहऱ्यावरचे हास्यच आमच्यासाठी खरी जयंती!”
भारतीय लहुजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष समीर वीर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्याची एक वेगळी आणि समाजाला प्रेरणा देणारी परंपरा जपली आहे. दरवर्षी कोणताही डीजे, मिरवणूक किंवा फटाक्यांवर अनावश्यक खर्च न करता ते अनाथ आश्रमात जयंती साजरी करतात.
याबाबत बोलताना समीर वीर म्हणाले, “जयंतीच्या नावाखाली होणारा अवाजवी खर्च टाळला पाहिजे. काही ठिकाणी मिरवणुकांमध्ये मद्यपान करून सहभागी होण्याचे प्रकार घडतात, त्यामुळे महापुरुषांच्या विचारांची व प्रतिमेची विटंबना होते. त्यापेक्षा अनाथ मुलांसोबत आनंद वाटून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे, हेच महापुरुषांना खरी मानवंदना आहे.”
समीर वीर यांच्या या सामाजिक उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत असून, महापुरुषांची जयंती केवळ उत्सव म्हणून नव्हे, तर समाजोपयोगी कार्यातून साजरी करण्याचा त्यांचा संदेश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.