शिर्डी : साई निर्माण ग्रुप, साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट व शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली भव्य १२ ज्योतिर्लिंग यात्रा अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडली असून, यात्रेत सहभागी झालेले तब्बल १५०० साईभक्त सध्या सुखरूप शिर्डीच्या परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या यात्रेचे आयोजन करण्यात आले.
कोरोना महामारीमुळे मागील काही वर्षांपासून खंड पडलेल्या या बहुप्रतिक्षित यात्रेचे यंदा पारायण सोहळ्यानंतर मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. दि. २९ ऑगस्ट रोजी साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकावरून विशेष रेल्वेने १५०० भाविकांची ही नेपाळ व उत्तर भारत तीर्थयात्रा सुरू झाली.
काशीपासून अयोध्येपर्यंत भक्तीचा प्रवास
यात्रेचे यंदाचे विशेष आकर्षण म्हणजे मागील टप्प्यात राहिलेली, मात्र अत्यंत महत्त्वाची तीर्थस्थळे यावेळी यात्रेत समाविष्ट करण्यात आली. भाविकांनी सर्वप्रथम पवित्र काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले. त्यानंतर अयोध्येत पोहोचून भव्य रामलल्लाच्या मंदिराचे दर्शन घेण्याचा सुवर्णयोग भाविकांना लाभला.
भारतामधील या पवित्र स्थळांचे दर्शन घेतल्यानंतर यात्रा नेपाळच्या दिशेने रवाना झाली. उत्तर प्रदेशातील नौतनवा रेल्वे स्थानकावरून बसने भारत-नेपाळ सीमा पार करत भाविक काठमांडू येथे पोहोचले. तेथे प्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिर तसेच मनोकामना मातेचे दर्शन घेऊन भाविक आता शिर्डीच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघाले आहेत.
चोख नियोजनामुळे यात्रा निर्विघ्न
१५०० हून अधिक भाविकांचा एवढा मोठा प्रवास कोणत्याही अडचणीविना पार पडावा, यासाठी आयोजकांकडून अत्यंत काटेकोर नियोजन करण्यात आले होते. प्रवासादरम्यान भाविकांसाठी मिष्टान्न भोजन, चहा-नाश्ता, फराळ तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
भाविकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत २४ तास आरोग्य सेवा उपलब्ध ठेवण्यात आली होती. तसेच विविध तीर्थस्थळांवर जाण्यासाठी सोयीस्कर बससेवेची व्यवस्था करण्यात आली होती.
भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान
दिवस-रात्र मेहनत, नियोजन आणि समन्वयातून ही संपूर्ण यात्रा निर्विघ्नपणे पार पडल्याने भाविकांमध्ये मोठे समाधानाचे वातावरण आहे. काशी विश्वनाथ, रामलल्ला, पशुपतीनाथ आणि मनोकामना मातेचे दर्शन घेतल्याचा आनंद प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे.
सर्व १५०० साईभक्त सध्या शिर्डीच्या परतीच्या प्रवासात असून, लवकरच ते सुखरूप शिर्डीत दाखल होणार आहेत. या यात्रेमुळे साईभक्तांना देश-विदेशातील विविध पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन एकाच यात्रेत घेण्याची अनोखी संधी मिळाली.