
राहाता (प्रतिनिधी) :
साकुरीतील कथित पत्त्यांच्या क्लबवर राहाता पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर प्रकरण संपलेले नाही, उलट आता तपासाच्या दिशेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धाड टाकून गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र या संपूर्ण प्रकरणामागील सूत्रधार कोण? क्लबचा खरा चालक कोण? आर्थिक लाभ कोणाला होत होता? आणि त्या व्यक्तीपर्यंत तपास पोहोचणार का? अशा प्रश्नांची चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे.
धाडीच्या वेळी तब्बल ४५ ते ५० जण उपस्थित असल्याची चर्चा असताना गुन्हा मात्र केवळ १० जणांवर दाखल झाल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. उर्वरित लोक फक्त प्रेक्षक होते की त्यांचीही भूमिका होती? त्यांची ओळख पटविण्यात आली का? त्यांचे जबाब नोंदविण्यात आले का? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत.
याहून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, क्लब वर्षानुवर्षे सुरू होता, अशी स्थानिकांमध्ये चर्चा आहे. जर तसे असेल, तर संबंधित यंत्रणांना याची माहिती नव्हती का? की माहिती असूनही दुर्लक्ष करण्यात आले? जर क्लबकडे कोणताही वैध परवाना नसेल, तर तो इतका काळ सुरू राहिलाच कसा? आणि परवाना असेल, तर त्याच ठिकाणी जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा कसा दाखल झाला?
या प्रकरणात आर्थिक व्यवहारांची चौकशी तितकीच महत्त्वाची आहे. जप्त झालेले साहित्य, टोकन, कॉईन आणि रोख रक्कम यामागील व्यवहारांची साखळी तपासली जाणार का? क्लबमधून रोज किती उलाढाल होत होती? त्याचा लाभ कोणाला मिळत होता? याचा तपास झाल्याशिवाय संपूर्ण सत्य बाहेर येणार नाही, असे नागरिकांचे मत आहे.
या कारवाईनंतर आता नागरिकांची अपेक्षा केवळ गुन्हा दाखल करण्यापुरती राहिलेली नाही. या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश होऊन जबाबदार प्रत्येक व्यक्तीवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा ही कारवाई केवळ औपचारिक ठरल्याची भावना अधिक बळावू शकते.
प्रश्न अजूनही कायम…
क्लबचा खरा सूत्रधार कोण?
वर्षानुवर्षे हा प्रकार सुरू राहिला कसा?
४५-५० जणांपैकी उर्वरित व्यक्तींची चौकशी होणार का?
आर्थिक व्यवहारांचा तपास ईडी किंवा आर्थिक गुन्हे शाखेकडे जाणार का?
या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होणार का?
आता नागरिकांना उत्तरांची अपेक्षा आहे; कारण कायद्यापेक्षा कुणीही मोठा नसतो.
