अहिल्यानगर | प्रतिनिधी
शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर भररात्री सिनेस्टाईल दरोडा टाकून त्यांचे अपहरण करणाऱ्या सराईत टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने मोठा धक्का दिला आहे. या प्रकरणातील पाच आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी पाच जण फरार आहेत. या धाडसी कारवाईमुळे शिर्डीहून परतणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
१४ जुलै रोजी रात्री विशाल संपत पवार (रा. सुपा, ता. पारनेर) हे आपल्या दोन मित्रांसह शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन स्कॉर्पिओमधून परतत होते. देहरे शिवारातील रेल्वे पुलाजवळ दोन चारचाकी वाहनांनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर सात ते आठ जणांनी हातातील लाकडी दांडक्यांनी पवार व त्यांच्या मित्रांवर बेछूट हल्ला चढवला. स्कॉर्पिओचे नुकसान करत संभा लोणकर, सुभाष गाढवे आणि संजु लोणकर यांना जबरदस्तीने गाडीत बसवून अपहरण करण्यात आले. नंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी सोडून आरोपी पसार झाले.
या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १४०(३), ११८(२), ३२४(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तपास सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे प्रथम पिंटू उर्फ भाऊ रसाळ आणि बंटी उर्फ स्वप्निल पाबळे यांना गावठी कट्ट्यासह ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या चौकशीत संपूर्ण कटाचा पर्दाफाश झाला.
त्यानंतर चास परिसरात सापळा रचून भाऊसाहेब लंघे, हर्षद थोरात, जावेद काळे, मिनीनाथ वाघस्कर आणि जितेश सरडे यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देत आणखी पाच साथीदारांची नावे उघड केली. हे सर्व आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
या कारवाईमुळे शिर्डी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. भाविकांच्या वाहनांना लक्ष्य करणाऱ्या अशा टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत असून, शिर्डी परिसरातील प्रमुख मार्गांवर रात्रीच्या गस्ती आणि नाकाबंदी अधिक प्रभावी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.



