
शिर्डी | प्रतिनिधी
देश-विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीत रविवारी रात्री घडलेल्या रक्तरंजित घटनेने संपूर्ण साईनगरी हादरली आहे. श्री साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोरील भर वर्दळीच्या परिसरात फळविक्री करणाऱ्या जयश्री साईनाथ शिरसागर (वय ३०) यांच्यावर दोन तरुणींनी धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या जयश्री यांच्यावर साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रात्रभर उपचार सुरू होते. मात्र सोमवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण शिर्डीत शोककळा पसरली असून संतापाची लाट उसळली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मंदिर परिसरात स्टिकर विक्री करणाऱ्या अंजली खंडीझोड (२२) आणि फिजा पटेल (२१), रा. कालिका नगर, शिर्डी यांचा फळविक्रेत्या जयश्री शिरसागर यांच्याशी विक्रीच्या जागेवरून वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली; मात्र काही क्षणांतच हा वाद विकोपाला गेला. संतापाच्या भरात आरोपींनी धारदार चाकूने जयश्री यांच्यावर सपासप वार केल्याचा आरोप आहे.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जयश्री यांना स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु गंभीर जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर शिर्डी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपी महिलांना ताब्यात घेतले. जयश्री यांच्या मृत्यूनंतर आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि इतर पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
मंदिर परिसरातच रक्तरंजित घटना; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न
ही घटना ज्या ठिकाणी घडली तो परिसर दिवस-रात्र भाविकांनी गजबजलेला असतो. अशा ठिकाणी भर गर्दीत धारदार शस्त्राने हल्ला होऊन एका महिलेचा जीव जाणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. घटनेनंतर काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक भाविकांनी घाबरून घटनास्थळ सोडले.
जागेच्या वादातून थेट खून?
प्राथमिक तपासानुसार हा वाद फेरीवाल्यांच्या विक्रीच्या जागेवरून झाल्याचे समोर येत आहे. किरकोळ कारणातून थेट जीव घेण्यापर्यंत मजल गेल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोलिसांकडून या वादामागे पूर्वीचे कोणते मतभेद होते का, याचाही तपास केला जात आहे.
नागरिकांचा संताप; कठोर कारवाईची मागणी
या घटनेनंतर शिर्डीतील व्यापारी, नागरिक आणि भाविकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. मंदिर परिसरातील फेरीवाल्यांचे नियोजन, कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्हीवर प्रभावी देखरेख आणि अशा हिंसक घटनांवर कठोर नियंत्रणाची मागणी जोर धरू लागली आहे. “साईनगरीतच जर भर गर्दीत खून होत असेल, तर सर्वसामान्य नागरिक आणि भाविक सुरक्षित कसे?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
पोलीस तपास वेगाने सुरू
शिर्डी पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून हल्ल्याचे नेमके कारण, आरोपींची भूमिका आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम उलगडण्याचे काम सुरू आहे.
गुन्हा नोंद (FIR) ║
╠══════════════════════════════════════╣
║ पोलीस ठाणे : शिर्डी ║
║ गुन्हा क्र. : 636/2026 ║
║ कायदा : भारतीय न्याय संहिता, 2023 ║
║ कलम : 109(1) ║
╠══════════════════════════════════════╣
║ फिर्यादी : ║
║ साईनाथ भालचंद्र क्षिरसागर (वय 35) ║
║ व्यवसाय : मजुरी ║
║ रा. बाजारतळ, शिर्डी, ता. राहाता ║
╠══════════════════════════════════════╣
║ आरोपी : ║
║ 1) फिजा उर्फ नोझीया लुकमान पटेल ║
║ रा. कालिकानगर, शिर्डी ║
║ ║
║ 2) अंजली खंडीझोड ║
║ रा. कालिकानगर, शिर्डी ║
╠══════════════════════════════════════╣
║ घटना : ║
║ दि. 19/07/2026 ║
║ वेळ : रात्री 09:30 ते 10:00 वा. ║
║ ठिकाण : श्री साईबाबा मंदिर ║
║ गेट क्र. 4 समोर, शिर्डी ║
╚════════════════


