
शिर्डी | प्रतिनिधी
साईबाबांच्या पावनभूमी असलेल्या शिर्डीत वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी पोलिस महासंचालकांचे लक्ष वेधत तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शिर्डीचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारांवर पोलिसांचा प्रभावी वचक निर्माण करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून हस्तक्षेप होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. पिपाडा यांनी पत्र देऊन चर्चेदरम्यान सांगितले की, शिर्डी मतदारसंघात एका शेतकऱ्याच्या मुलाला मोक्का प्रकरणातील आरोपी दीपक पोकळे याने जिवंत जाळून ठार मारल्याची घटना घडली. त्यानंतर साईबाबा मंदिराच्या गेटजवळ भरदिवसा खुनाची घटना घडल्याने संपूर्ण राज्य हादरले. याशिवाय कामगारांचे खून, चेन स्नॅचिंगसारख्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांसह साईभक्तांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
देश-विदेशातून लाखो भाविक श्रद्धेने शिर्डीत येतात. मात्र, वाढत्या गुन्हेगारीमुळे भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा घटना सुरूच राहिल्यास शिर्डीची प्रतिमा मलिन होऊन भाविकांची संख्या कमी होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
डॉ. पिपाडा यांनी पोलिस महासंचालकांना शिर्डीसाठी विशेष सुरक्षा आराखडा तयार करणे, गुन्हेगारांविरोधात कठोर मोहीम राबवणे, सराईत आरोपींवर प्रभावी कारवाई करणे आणि मंदिर परिसरासह संपूर्ण शहरात पोलिस बंदोबस्त व गस्त वाढवण्याची मागणी केली.
“शिर्डी ही श्रद्धेची नगरी आहे, दहशतीची नाही. साईनगरीचे पावित्र्य कायम राखण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस महासंचालकांनी स्वतः लक्ष घालून कठोर निर्णय घ्यावेत,” अशी ठाम भूमिका डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी मांडली.
