शिर्डी (प्रतिनिधी) : दिव्यांगांना दान नव्हे, तर स्वाभिमानाने जगण्याचा आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा अधिकार मिळावा, या विचाराला प्रत्यक्ष कृतीची जोड देत शिर्डी येथे दिव्यांगांसाठी उभारण्यात आलेल्या पाच व्यावसायिक स्टॉलचे लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न झाले. दिव्यांगांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने हा ऐतिहासिक टप्पा मानला जात असून, यानिमित्त आयोजित दिव्यांग संवाद कार्यक्रमात प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांगांच्या हक्कांसाठी बुलंद आवाज उठवला.

यावेळी बोलताना आ. बच्चू कडू म्हणाले की, दिव्यांगांना केवळ शासकीय मदत किंवा अनुदान देऊन त्यांचे जीवन बदलणार नाही. त्यांना कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे ही शासन आणि समाजाची संयुक्त जबाबदारी आहे. प्रत्येक शहरात दिव्यांगांसाठी राखीव व्यावसायिक स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले, तर हजारो दिव्यांग कुटुंबांना स्वाभिमानाने जगण्याचा नवा मार्ग मिळेल. दिव्यांगांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
शिर्डीसारख्या जागतिक कीर्तीच्या तीर्थक्षेत्रात दिव्यांगांसाठी व्यावसायिक स्टॉल उपलब्ध करून देण्याचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह असल्याचे सांगत आ. बच्चू कडू यांनी अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्या दूरदृष्टीचे विशेष कौतुक केले. तसेच शिर्डी नगर परिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष अभय भय्या शेळके पाटील, सर्व नगरसेवक आणि संबंधित प्रशासनाने दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या उपक्रमामुळे अनेक दिव्यांगांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार असून, त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला मोठी चालना मिळणार आहे. शिर्डीत सुरू झालेला हा उपक्रम राज्यातील इतर शहरांसाठीही आदर्श ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रहार दिव्यांग संघटनेचे राज्याध्यक्ष सातव, मोकळ, जिल्हाध्यक्ष घाडगे, अॅड. पोकळे, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सांगळे, विनोदसिंग परदेशी, प्रहार युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. पांडुरंग औताडे, बाळासाहेब खर्जुले, आप्पासाहेब ढुस यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन प्रहार संघटनेचे राहाता तालुकाप्रमुख अमोल बाणाईत आणि शिर्डी शहरप्रमुख विकी मिसर यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा व तालुक्यातील मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव-भगिनी, प्रहारचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.
दिव्यांगांच्या स्वाभिमानाचा आणि आर्थिक स्वावलंबनाचा नवा अध्याय शिर्डीत सुरू झाला असून, समाजाला संवेदनशीलतेची आणि समान संधीची नवी दिशा देणारा हा उपक्रम ठरत आहे.