शिर्डी (प्रतिनिधी) : श्री साईबाबांच्या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त देश-विदेशातून लाखो साईभक्त शिर्डीत दाखल झाले आहेत. हजारो भाविक तासनतास दर्शन रांगेत उभे राहून श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेत असताना, काही व्यक्तींनी स्वतःला शिर्डीचे रहिवासी असल्याचे सांगत गावकरी प्रवेशद्वारातून थेट प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा समोर आल्याने साईभक्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या व्यक्तींकडे शिर्डी पत्त्याची आधार कार्डे असल्याचे दिसून आल्याने त्या कागदपत्रांच्या सत्यतेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी गावकरी गेटवर काही व्यक्ती स्वतःला स्थानिक रहिवासी असल्याचे सांगत प्रवेशासाठी आग्रही असल्याचे दिसून आले. परिसरातील उपस्थितांच्या म्हणण्यानुसार, संबंधितांपैकी अनेक जण हिंदी भाषेत संवाद साधत होते. त्यामुळे त्यांच्या ओळखीबाबत आणि त्यांनी दाखविलेल्या शिर्डीच्या पत्त्याच्या आधार कार्डांच्या सत्यतेबाबत संशय निर्माण झाला. या सर्व प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणेची पडताळणी प्रक्रिया किती प्रभावी आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, जर एखादी व्यक्ती स्थानिक नसतानाही स्थानिक असल्याचे भासवून विशेष प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो केवळ नियमभंगाचा विषय नसून मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित गंभीर बाब ठरू शकते. त्यामुळे संबंधित व्यक्तींची ओळख, त्यांनी सादर केलेली कागदपत्रे आणि त्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया याची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याची भावना साईभक्त व्यक्त करत आहेत.
दरम्यान, साई संस्थानकडे मंदिर परिसरातील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवणारी अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा आहे. त्यामुळे गावकरी गेटवरील संपूर्ण घटनाक्रम फुटेजमध्ये कैद झाला आहे. जर तसे असेल, तर संबंधित फुटेजची तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात कोणतीही अडचण नसावी, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.
याच दिवशी मंदिर परिसरात मोबाईल बंदीचे नियम असतानाही काही जण मुखदर्शन हॉलमध्ये मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण करताना दिसल्याची चर्चा आहे. नियम सामान्य साईभक्तांसाठीच आहेत का? गर्दीच्या काळात नियमांची अंमलबजावणी शिथिल का झाली? सुरक्षा तपासणीमध्ये नेमके काय घडले? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
साईभक्तांचे थेट सवाल…
लाखो भाविक तासनतास रांगेत उभे राहत असताना काहींना विशेष प्रवेशाचा प्रयत्न कसा करता आला?
शिर्डी पत्त्याची आधार कार्डे दाखविणाऱ्या व्यक्तींची ओळख आणि कागदपत्रांची पडताळणी झाली होती का?
गावकरी गेटवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी होणार का?
मोबाईल बंदी असतानाही मंदिरात व्हिडिओ चित्रीकरण कसे झाले?
सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींची जबाबदारी निश्चित होणार का?
साईभक्तांचे म्हणणे आहे की, हा विषय कोणत्याही व्यक्ती किंवा गटापुरता मर्यादित नसून श्री साईबाबांच्या मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेचा, नियमांच्या समान अंमलबजावणीचा आणि भाविकांच्या विश्वासाचा आहे. त्यामुळे प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशा प्रकारांना कायमचा आळा घालावा. लाखो साईभक्तांचा विश्वास टिकवायचा असेल, तर या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे देणे आता अत्यावश्यक झाले आहे.
शिर्डीत बोगस आधार कार्ड बनविणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती समोर येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीचा शोध घ्यावा. दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी. साईबाबा मंदिराच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड होऊ नये.”
— सर्जेराव कोते
मानकरी, श्री साईबाबा संस्थान, शिर्डी


