शिर्डी | प्रतिनिधी : देश-विदेशातील लाखो साईभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी शहरासमोर आज सर्वात मोठा प्रश्न भक्तांचा नाही, तर स्थानिकांच्या अस्तित्वाचा निर्माण झाला आहे. व्यवसाय कोलमडत आहेत, तरुणांचे रोजगार कमी होत आहेत, अनेक जुन्या कुटुंबांना पिढीजात मालमत्ता विकून गाव सोडावे लागत आहे. या गंभीर वास्तवाकडे दुर्लक्ष करून काहीजण स्वतःचे हितसंबंध जपत “झेलेगिरी” करण्यात व्यस्त असल्याची संतप्त प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांनी व्यक्त केली आहे.
बनकर म्हणाले, “महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आहेत. पण झेलेगिरी करणाऱ्यांची मात्र जत्रा भरली आहे. शिर्डी काय होती आणि आज काय झाली, याचा प्रामाणिकपणे विचार करण्याची गरज आहे.”
त्यांनी सांगितले की, स्थानिक व्यापारी, हातावर पोट भरणारे छोटे व्यावसायिक, पॉलिश कामगार आणि सर्वसामान्य नागरिक गेली अनेक वर्षे अडचणीत आहेत. व्यवसाय वाढेल या आशेवर दिवस ढकलले जात आहेत; पण वास्तव इतके भयावह आहे की अनेकांनी स्वतःची जुनी घरे, दुकाने आणि मालमत्ता विकून शिर्डी कायमची सोडली. हा केवळ आर्थिक नव्हे, तर सामाजिक ऱ्हासाचा इशारा आहे.
बनकर यांनी मंदिर परिसरातील परिस्थितीवरही थेट बोट ठेवत म्हटले की, “‘100% साईराम’ या पवित्र शब्दांचा आधार घेऊन काहीजण स्वतःचे हितसंबंध साधत आहेत. साईबाबांच्या नावाचा वापर कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तनासाठी किंवा दबावासाठी होऊ नये. हे थांबले तर शिर्डी पुन्हा सुरक्षित, शिस्तबद्ध आणि भक्तांसाठी आदर्श शहर म्हणून उभे राहू शकते.”
त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शिर्डी पोलीस, नगरपरिषद प्रशासन आणि इतर शासकीय यंत्रणा सक्षम आहेत. त्यामुळे मंदिर परिसरात दिवसभर अनावश्यक वावर, दबावाचे वातावरण किंवा स्वतःला सर्वेसर्वा समजणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्याची वेळ आली आहे.
स्थानिकांच्या मनातील वेदनांना मिळाला आवाज
बनकर यांच्या विधानात अनेक स्थानिकांच्या मनातील भावना व्यक्त झाल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. शिर्डीचा विकास केवळ मोठ्या प्रकल्पांनी होणार नाही, तर स्थानिक व्यापारी, छोटे उद्योजक, कामगार आणि सामान्य नागरिक यांचा विश्वास जिंकूनच होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
: परखड शब्द
“साईबाबांच्या नावाचा आधार घेऊन कोणीही शहरावर वर्चस्व गाजवू नये. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. स्थानिकांचा व्यवसाय, रोजगार आणि सुरक्षितता हेच शिर्डीच्या विकासाचे खरे मापदंड आहेत. शिर्डीला झेलेगिरी नव्हे, तर शिस्त, पारदर्शकता आणि प्रामाणिक नेतृत्वाची गरज आहे.” — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर