शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डीतील गुटखा तस्करी प्रकरणात अन्न व औषध प्रशासन (FDA) अधिकाऱ्यांनी संशयास्पद मौन बाळगत कर्तव्यात गंभीर कसूर केल्याचा आरोप करत राज्याचे एफडीए आयुक्त, अन्न व औषध प्रशासन मंत्री, लोकायुक्त आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) यांच्याकडे ई-मेलद्वारे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीमुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तक्रारीत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, गुटखा तस्करीसारख्या गंभीर आणि जनहिताशी संबंधित प्रकरणात अपेक्षित कारवाई न करता संबंधित अधिकाऱ्यांनी कर्तव्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे नेमके कोणाला वाचविण्याचा प्रयत्न झाला? कारवाई का रोखली गेली? यामागे कोणाचे राजकीय किंवा आर्थिक हितसंबंध आहेत का? अशा अनेक प्रश्नांनी आता डोके वर काढले आहे.
तक्रारदाराने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशीपुरती मर्यादित न राहता कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करून संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आता या तक्रारीनंतर राज्यातील सर्वोच्च यंत्रणा कोणती भूमिका घेणार, दोषींवर खरोखर कारवाई होणार की हे प्रकरणही कागदावरच दडपले जाणार, याकडे शिर्डीसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
:
जनतेचे सवाल…
गुटखा प्रकरणात वेळेवर कारवाई का झाली नाही?
संबंधित अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली का?
कोणाला वाचविण्यासाठी कारवाई टाळली गेली?
दोषींवर गुन्हे दाखल होणार की फक्त चौकशीचा देखावा होणार?