शिर्डी | प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात ‘दैनिक साईदर्शन’ने सातत्याने आवाज उठविल्यानंतर आता पोलिसांच्या कारवाईला वेग आल्याचे चित्र दिसत आहे. कालच मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वाळू तस्करीच्या प्रकारांकडे लक्ष वेधत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली होती. त्यानंतरच दुसऱ्याच दिवशी स्थानिक गुन्हे शाखेने राहाता आणि कोपरगाव तालुक्यात धडक कारवाई करत तब्बल ₹30 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने अवैध वाळू वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबविली. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने 17 आणि 18 सप्टेंबर रोजी राहाता व कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी छापे टाकले.

राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 385/2026 अन्वये कारवाई करण्यात आली. या प्रकरणात विशाल संजय जोगदंड, रामनाथ हरीभाऊ शिंदे यांना ताब्यात घेण्यात आले असून स्वप्नील गोंदकर हा फरार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या कारवाईत ₹15 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा क्रमांक 424/2026 अन्वये कारवाई करत आकाश दशरथ पगारे याला ताब्यात घेण्यात आले असून विशाल लोंढे हा फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईतही ₹15 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
‘साईदर्शन’च्या सवालानंतर यंत्रणा जागी?
वाळू तस्करीविरोधात वारंवार वृत्त प्रसिद्ध करूनही कारवाई होत नसल्याचा मुद्दा ‘दैनिक साईदर्शन’ने उपस्थित केला होता. याच पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक आणि संबंधित विभागांकडे लेखी अर्ज करून वाळू तस्करीच्या प्रकारांची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने केलेली ही मोठी कारवाई निश्चितच लक्षवेधी ठरत आहे. या कारवाईचा आणि ‘साईदर्शन’च्या अर्जाचा थेट संबंध असल्याचे अधिकृतरीत्या पोलिसांनी नमूद केलेले नाही; मात्र अर्जानंतर अवैध वाळू वाहतुकीविरोधात झालेली ही तातडीची कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे.
वाळू तस्करीविरोधातील ही कारवाई केवळ दोन ठिकाणांपुरती मर्यादित न राहता जिल्ह्यातील संपूर्ण अवैध साखळीपर्यंत पोहोचणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
‘साईदर्शन’चा सवाल — कारवाई सुरू झाली; आता वाळू तस्करीची संपूर्ण साखळी कधी उघडणार?
वाळू तस्करांवर कारवाई झाली; आता अभय देणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही खाते निहाय चौकशी करा!
राहाता व कोपरगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करून तीन आरोपींना ताब्यात घेत तब्बल ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईचे स्वागत होत असतानाच आता एक महत्त्वाचा सवाल उपस्थित होत आहे—वाळू तस्करी इतक्या दिवसांपासून सुरू असेल, तर संबंधित यंत्रणांना याची माहिती नव्हती का
अवैध वाळू उपसा व वाहतुकीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, कर्तव्यात कसूर केली किंवा संबंधितांना कथितरीत्या संरक्षण दिल्याचा आरोप असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही खाते निहाय स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
केवळ वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून प्रश्न संपणार नाही. अवैध व्यवसायाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत करणारी साखळी आहे का, तस्करांना पूर्वसूचना दिली जाते का, कारवाई टाळण्यासाठी कोणाचा दबाव वापरला जातो का, तसेच संबंधित कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात वारंवार वाळू वाहतूक होत असताना त्यांनी काय कारवाई केली, याचीही तपासणी होणे गरजेचे आहे.
खाते निहाय चौकशीची गरज
महसूल, पोलीस, परिवहन अथवा संबंधित स्थानिक यंत्रणांमधील ज्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात अवैध वाळू वाहतुकीचे प्रकार आढळून आले आहेत, त्यांच्या मागील कालावधीतील कारवाईची नोंद तपासण्यात यावी. आवश्यक असल्यास वाहनांची तपासणी, जप्तीची नोंद, पंचनामे, तक्रारी, सीसीटीव्ही फुटेज आणि उपलब्ध अधिकृत नोंदी तपासून कर्तव्यात कसूर आढळल्यास नियमानुसार विभागीय कारवाई करण्यात यावी.
तस्करांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांचे कौतुक; मात्र तस्करी करणारे हात पकडण्याबरोबरच त्यांना अभय मिळाले का, यामागची यंत्रणाही तपासणे तितकेच महत्त्वाचे आहे.
‘साईदर्शन’चा सवाल — वाळू तस्करांवर हातोडा पडला; आता त्यांना अभय देणाऱ्यांची पाळी कधी?