
श्रीगोंदा | प्रतिनिधी
श्रीगोंदा शहरातील वडाळी रस्त्यालगतच्या जंगलात एका तरुणीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने बुधवारी सकाळी शहरात एकच खळबळ उडाली. सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना जंगलात मृतदेह जळत असल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी धाव घेत मृतदेहावरील आग विझवण्यात आली. या धक्कादायक घटनेने श्रीगोंदेकरांची सकाळ हादरवून टाकली.
मात्र, या खुनामागील रहस्य उलगडले ते एका फोन कॉलमुळे. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत काही तासांतच संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
संशयातून वाद, वादातून खून !
प्राथमिक माहितीनुसार, श्रीगोंदा शहरातील काळकाई चौक परिसरात राहणारा शुभम ओहळ आणि मृत तरुणी हे एकत्र राहत होते. सोमवारी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले. संतापाच्या भरात शुभमने तरुणीला पाईपने बेदम मारहाण केल्याचे समोर येत आहे.
मारहाणीत ती गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडल्यावर तिच्या डोक्यात कठीण वस्तूने वार करण्यात आला. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
खून झाल्यानंतर घाबरलेल्या आरोपीने घराला कुलूप लावून नगरकडे पलायन केले. तेथे जाऊन त्याने आपल्या वडिलांना संपूर्ण प्रकार सांगितल्याचे समजते. मात्र, त्यानंतरही आरोपीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
मंगळवारी रात्री त्याने तरुणीचा मृतदेह वडाळी जंगल परिसरात नेऊन पेटवून दिला. खुनाचे सर्व पुरावे नष्ट होतील, असा त्याचा समज होता. मात्र नियतीला काही वेगळेच मंजूर होते.
एका फोन कॉलने फोडले खुनाचे गूढ
घटना घडल्यानंतर आरोपीने नगरमधील एका मित्राला फोन करून, “मी माझ्या बायकोला मारून टाकले,” अशी कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. हा फोन आल्यानंतर संबंधित मित्र हादरला. प्रसंगावधान राखत त्याने तातडीने कोतवाली पोलिसांशी संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली.
कोतवाली पोलिसांनी तत्काळ श्रीगोंदा पोलिसांना सतर्क केले. त्यानंतर पोलिसांनी रात्रीच आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले.
“ती नीट राहत नव्हती, संशय होता”
पोलिसांनी चौकशी सुरू करताच आरोपीने गुन्ह्याची माहिती दिली आणि पोलिसांना थेट मृतदेह जाळण्यात आलेल्या ठिकाणी नेल्याचे समजते.
प्राथमिक चौकशीत, “माझे तिच्यावर प्रेम होते. मात्र आमच्यात सतत वाद होत होते. मला तिच्यावर संशयही होता. रागाच्या भरात हे कृत्य घडले,” अशी माहिती आरोपीने दिल्याचे समजते.
या प्रकरणाचा तपास सुरू असून अंतिम तपासातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
फोन कॉल ठरला आरोपीसाठी फास
खून करून मृतदेह जाळत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा डाव अखेर एका फोन कॉलमुळे फसला. मित्राला केलेल्या कबुलीच्या फोनमुळे पोलिसांना धागादोरा मिळाला आणि काही तासांतच संपूर्ण खुनाचा उलगडा झाला. त्यामुळे “गुन्हेगार कितीही हुशार असला तरी एखादी चूक त्याला तुरुंगापर्यंत पोहोचवते,” याची पुन्हा एकदा प्रचिती आली.

