
शिर्डी | प्रतिनिधी
शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार Arvind Sawant यांनी मंगळवारी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला.
यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना खासदार सावंत यांनी राज्य व केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “महाराष्ट्र कलंकित झाला असून राज्यातील कारभार लांछनास्पद बनला आहे. देशातील लोकशाही संस्था, निवडणूक प्रक्रिया आणि संविधानिक व्यवस्थेची सातत्याने नाचक्की होत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
“शिशुपालाचे अपराध हजार झाले तरी कारवाई नाही”
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना सावंत म्हणाले, “शिशुपालाचे शंभर अपराध झाल्यानंतर त्याचा अंत झाला, असे पुराणात सांगितले जाते. मात्र आज शंभराचे हजार अपराध झाले तरी संबंधितांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. देश आणि राज्य नेमके कोणत्या दिशेने चालले आहे, हा गंभीर प्रश्न आहे.”
निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था आणि तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह
निवडणूक आयोगाच्या नियुक्ती प्रक्रियेवर तसेच न्यायव्यवस्थेवर दबाव असल्याचा आरोप करत सावंत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. “लोकशाहीतील सत्तेचा समतोल बिघडवण्याचे काम सुरू आहे. तपास यंत्रणांचा वापर राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी केला जात आहे,” असा दावा त्यांनी केला.
“सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी”
महिला योजनांमधील अपात्रतेच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारवर टीका केली. “लाखो महिलांना अपात्र ठरविणारे सरकारच नैतिकदृष्ट्या अपात्र ठरले आहे. सत्तेसाठी ३६५ दिवस राजकारण करणाऱ्या पक्षाला जनतेच्या प्रश्नांपेक्षा सत्ता महत्त्वाची वाटते,” असे सावंत म्हणाले.
राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्यावरही भाष्य
राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलताना सावंत यांनी शिवसेनेच्या भूमिकेचा उल्लेख केला. “राम मंदिरासाठी शिवसैनिकांचे योगदान कोणीही विसरू शकत नाही. प्रभू रामचंद्रांचा आदर्श त्यागाचा होता, सत्तेच्या मोहाचा नव्हता. आज धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी रामाच्या आदर्शांचे स्मरण ठेवावे,” असे ते म्हणाले.
“महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आणि आता राष्ट्र कुठे नेऊन ठेवले, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. संविधान आणि लोकशाही संस्थांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.” — खासदार अरविंद सावंत
ऑपरेशन टायगर नव्हे, टायगरला आधी दात हवेत!”
“सत्ताधाऱ्यांनी सुरू केलेले ‘ऑपरेशन टायगर’ हे केवळ राजकीय नाटक आहे. ज्यांच्याकडे स्वतःची ताकद नाही, ते फोडाफोडीच्या राजकारणातून सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. खरा वाघ कधीही लाचार नसतो. महाराष्ट्रातील जनताच योग्य वेळी अशा राजकारणाला उत्तर देईल.”
— खासदार अरविंद सावंत

