
शिर्डी : एकेकाळी घरातील आजोबा, वडील सकाळी वर्तमानपत्र हातात घेऊन देश-विदेशातील घडामोडी वाचत असत. त्या वातावरणात वाढणाऱ्या मुलांच्या मनात नकळत वाचनाची आवड निर्माण होत असे. पुस्तक, वर्तमानपत्र आणि ज्ञान यांचा सुगंध प्रत्येक घरात दरवळत होता. याच संस्कारातून ग्रामीण भागातील अनेक मुले डॉक्टर, इंजिनिअर, वकील आणि अधिकारी बनली.
मात्र आजचे चित्र चिंताजनक असल्याची खंत व्यक्त करत श्री साई निर्माण इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक संदीप डांगे सर यांनी समाजाला विचार करायला भाग पाडणारे मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, आजच्या पिढीच्या हातात पुस्तकाऐवजी मोबाईल आला आहे. वाचनाची जागा रिल्स, व्हिडिओ गेम्स आणि सोशल मीडियाने घेतली आहे. त्यामुळे मुलांची विचारशक्ती, भाषिक कौशल्ये आणि अभ्यासाची गोडी कमी होत चालली आहे.
डांगे सर म्हणतात, “मुले उपदेशाने नाही तर अनुकरणाने शिकतात. आज आई-वडील स्वतः मोबाईलमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे मुलांवरही त्याच गोष्टींचे संस्कार होत आहेत. घरात वर्तमानपत्र वाचन, पुस्तकांची चर्चा आणि ज्ञानाचे वातावरण कमी होत असल्याने मुलांची वाचनाशी असलेली नाळ तुटत चालली आहे.”
त्यांनी पालकांना आवाहन केले की, मुलांसमोर मोबाईलचा वापर मर्यादित ठेवावा आणि स्वतः वाचनाची सवय लावावी. कारण मुलांना वाचनाचे महत्त्व सांगण्यापेक्षा ते कृतीतून दाखवणे अधिक प्रभावी ठरते. घरातील मोठी मंडळी पुस्तक वाचताना दिसली, तर मुलांमध्येही वाचनाची प्रेरणा निर्माण होईल.
आज अनेक लहान मुलांची सोशल मीडियावर खाती आहेत, ते रील स्टार बनण्याचे स्वप्न पाहतात; मात्र ज्ञान, विचार आणि संस्कारांचा पाया मजबूत करणारे वाचन मागे पडत आहे. ही स्थिती भविष्यासाठी धोक्याची घंटा असल्याचे डांगे सरांनी स्पष्ट केले.
समाज, पालक आणि शिक्षक यांनी वेळेवर जागे होऊन मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण केली नाही, तर भविष्यात वैचारिकदृष्ट्या कमकुवत पिढी तयार होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. “डिजिटल युगात तंत्रज्ञान आवश्यक आहे, पण ते पुस्तकांची जागा घेऊ शकत नाही. घराघरांत पुन्हा एकदा वाचनाचे वातावरण निर्माण करणे ही काळाची गरज आहे,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
शिक्षणाच्या पंढरीतील एका वारकऱ्याची ही तळमळ केवळ शिक्षकाची नाही, तर संपूर्ण समाजाला अंतर्मुख करणारी हाक आहे. आजही वेळ गेलेली नाही; मुलांच्या हातात मोबाईलसोबत पुस्तकही दिले, तरच उद्याची पिढी ज्ञानवान, संस्कारी आणि विचारसंपन्न घडेल.
✍️ “वाचन संस्कार हीच पुढच्या पिढीसाठी खरी संपत्ती” — संदीप डांगे सर


