ममता पिपाडा यांच्या विरोधातील – अहवाल फेटाळला

राहाता : राहाता नगरपरिषदेच्या तत्कालीन प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी आसिमा मित्तल यांनी आमच्या राजकीय विरोधकांना हाताशी धरून नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा ममता पिपाडा यांना पदावरून दूर करण्याकरीता खोटे पुरावे निर्माण करून बनावट अहवाल तयार केला होता. या प्रकरणाची सुनावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर झाली. या सुनावणीचा निकाल नगराध्यक्षा ममता पिपाडा व डॉ.राजेंद्र पिपाडा यांच्या बाजूने लागला असून बनावट अहवाल तयार करणा-या तात्कालीन मुख्याधिकारी असिमा मित्तल यांचा अहवाल फेटाळुन ममता पिपाडा यांच्या बाजुने निकाल दिला आहे.
याविषयी माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी ही माहिती आज शनिवारी दिली. त्यांनी सांगितले की, आसिमा मित्तल या फक्त एक महिन्यासाठी प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी म्हणून राहाता नगरपालिकेत आल्या होत्या. या काळात त्यांनी विधायक कामांवर भर देणे अपेक्षित होते, परंतु त्यांनी तसे न करता आमच्या विरोधकांनी त्यांना हाताशी धरून आमच्या विरोधात खोटा अहवाल तयार केला तसेच राहाता शहरात सुरू असलेल्या विकासकामात अडथळा निर्माण केला. त्यांनी नगरपरिषदेतील भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घातले. आमच्या विरोधात तयार केलेल्या अहवालाची कुठल्याही प्रकारची सत्यता न पडताळता तात्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी तो अहवाल आहे
तसाच शासनाकडे पाठविला होता. आम्ही राहाता नगरपालिकेत कुठलेही चुकीचे काम केलेले नव्हते. आम्हाला पदावरून दूर करण्यासाठी विरोधकांनी रचलेले ते षड्यंत्र होते. आमच्या विरोधात तयार केलेल्या अहवालाबाबत आमच्याकडे सबळ पुरावे असल्यामुळे या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीचा निकाल आमच्या बाजूने लागला. यामुळे विरोधकांचे मनसुबे पुन्हा एकदा धुळीस मिळाले आहेत. तसेच याच प्रकरणात आमच्या विरोधकांनी आमच्या विरोधात उच्च न्यायालयात सुद्धा याचिका केली होती न्यायालयाने याचिकाकर्त्यालाच ५० हजार रुपये दंड केला आहे.
आमच्या विरोधात कटकारस्थाने करुन विरोधकांच्या मदतीने तयार करून पाठवण्यात आलेल्या अहवालावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या बाजूने निकाल दिल्याने विरोधकांना पुन्हा एकदा दणदणीत चपराक मिळाली आहे.
आम्हाला पदावरुन दूर करणे हा अनुभव आमच्यासाठी काही नवा नाही. यापूर्वीही आमच्यावर आमच्या विरोधकांमार्फत खोट्या केसेस व खोटे आरोप असे अनेक प्रयोग कऱण्यात आले होते परंतु त्याला आम्ही भीक घातली नाही. आम्ही नेहमी विकासाच्या बाजूने होतो व आहोत त्यामुळे आमच्या विरोधात कितीही कटकारस्थाने रचली तरी त्यामध्ये विरोधक कधीच यशस्वी होवू शकत नाही याची आम्हाला खात्री आहे. मुख्यमंत्र्यांसमोर झालेल्या सुनावणीत आम्ही आमची बाजू पुराव्यानिशी मांडली त्यावर आयुक्त तथा संचालक यांचा अभिप्राय मागविण्यात आला व आम्ही पालिकेत कुठलेही चुकीचे काम केले नसल्याचे सिद्ध झाले व निकाल आमच्या बाजूने होवुन शेवटी सत्याचाच विजय झाला.
डॉ.राजेंद्र पिपाडा