
शिर्डी | प्रतिनिधी
राहाता तालुक्यातील शिंगवे येथे मागील आठवड्यात घडलेल्या गंभीर ॲट्रोसिटी (अत्याचार) प्रकरणात अखेर पोलिसांना एका आरोपीस अटक करण्यात यश आले असले, तरी तीन आरोपी अद्याप फरार असल्याने राहाता पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दि. ११ रोजी शिंगवे येथील मातंग वस्तीमध्ये सवर्ण समाजातील गोवर्धन रामराव बर्गे, कार्तिक गोवर्धन बर्गे, अश्विन गोवर्धन बर्गे व सागर शिवाजी काळे यांनी जातीवाचक शिवीगाळ करत दहशत माजवली. अण्णा भाऊ साठे चौकात येऊन मातंग समाजातील तरुणांना बेदम मारहाण करत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करण्यात आले होते.
या प्रकरणी नंदू पगारे यांनी राहाता पोलीस ठाण्यात ॲट्रोसिटीसह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.
🚨 गंभीर आरोप : आरोपींना पोलिसांचे अभय?
पीडित नातेवाईकांनी केलेल्या आरोपांमुळे प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.
गुन्हा दाखल झाल्याच दिवशी आरोपी राहाता पोलीस ठाण्यात हजर होते, मात्र पोलिसांनी त्यांना ठाण्यात बसवून ठेवून, गुन्हा नोंदणी सुरू असतानाच अर्थपूर्ण संबंध जोपासून त्यांना सोडून दिल्याचा आरोप पीडितांनी केला आहे.
“ज्या पोलिस कर्मचाऱ्यांनी आरोपींना सोडून दिले, त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली नाही, तर डीवायएसपी कार्यालयासमोर तमाम समाजाकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल,”
असा कडक इशारा पीडित नातेवाईकांनी दिला आहे.
👮 एकास अटक, तिघे फरार
या गुन्ह्याच्या तपासाची जबाबदारी शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे असून, विशेष पथकाने शिंगवे शिवारातून कार्तिक गोवर्धन बर्गे याला गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी अटक केली आहे.
उर्वरित तीन आरोपी फरार असून, त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
“लवकरच फरार आरोपींनाही अटक करून गजाआड केले जाईल,” असा पुनरुच्चार डीवायएसपी अमोल भारती यांनी केला आहे.
⚠️ राहाता पोलीस पुन्हा वादात
ॲट्रोसिटीसारख्या संवेदनशील प्रकरणात आरोपींना सुरुवातीला मोकळे सोडल्याचा आरोप झाल्याने राहाता पोलीस पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आता या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्वतंत्र चौकशी होते का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

