
शिर्डी : श्री साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात जेवणासाठी आलेल्या साईभक्तांना अधिक चांगली सेवा मिळावी, यासाठी व्यवस्थेत काही सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे मत कोपरगाव शिवसेना तालुकाप्रमुख भरत मोरे यांनी व्यक्त केले आहे.
मोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रसादालयात जेवण सुरू असताना काही कर्मचाऱ्यांची शिफ्ट संपल्याने चपाती मिळण्यास विलंब झाला. त्यामुळे काही काळ जेवणासाठी बसलेल्या भाविकांची गैरसोय झाली. शिफ्ट बदलाच्या वेळेत काही मिनिटे भोजनालय बंद ठेवण्याचा किंवा पर्यायी व्यवस्था करण्याचा विचार संस्थान प्रशासनाने करावा, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच प्रसादालयातील चपाती व पापडाच्या गुणवत्तेबाबतही काही भाविकांकडून तक्रारी होत असल्याचे त्यांनी सांगितले. साईभक्तांना आरोग्यदायी व दर्जेदार प्रसाद मिळावा, यासाठी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असेही मोरे यांनी नमूद केले.
या संपूर्ण प्रकरणी आपण कोणताही गोंधळ घातला नसून, झालेल्या प्रकाराबाबत लेखी तक्रार संस्थान प्रशासनाकडे सादर केली असल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले. तसेच आपल्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीबाबत कायदेशीर मार्गाने भूमिका मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणामुळे प्रसादालयातील सेवा व्यवस्थेबाबत चर्चा सुरू झाली असून, साईभक्तांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संस्थान प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

