
शिर्डी हे देश-विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि जागतिक कीर्तीचे धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाते. या धार्मिक नगरीत दारूबंदी कायदा लागू असतानाही शहरातील अनेक भागांमध्ये अवैध दारूची राजरोस विक्री सुरू असल्याचे आरोप नागरिकांकडून वारंवार केले जात आहेत. विशेष म्हणजे, दारूबंदी असताना सुरू असलेल्या या अवैध व्यवसायामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, शहरातील काही ठिकाणी अवैध दारूविक्री दिवसाढवळ्या सुरू असून त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत आहे. अवैध दारूच्या अड्ड्यांवरून अनेकदा वाद, भांडणे, मारहाणीच्या घटना घडत असून महिलांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. चोरी, घरफोडी, दहशत निर्माण करणे, सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणे अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नागरिकांचा आरोप आहे की, अनेकवेळा संबंधित यंत्रणांकडे तक्रारी करूनही अवैध धंद्यांवर अपेक्षित आणि कायमस्वरूपी कारवाई होत नसल्याने अवैध धंदे चालविणाऱ्यांचे मनोबल वाढत आहे. त्यामुळे “दारूबंदी कायदा केवळ कागदावरच आहे का?” असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
दरम्यान, परभणी जिल्ह्यात नूतन पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेत जुगार, मटका, अवैध दारू, गुटखा आणि रेती तस्करीविरोधात धडक कारवाईचे संकेत दिले आहेत. त्याचप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षकही शिर्डीसह संपूर्ण जिल्ह्यातील अवैध दारू अड्डे, मटका-जुगार व्यवसाय आणि इतर बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई करून कायद्याचा धाक निर्माण करतील का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

