शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डीतील साई मंदिर , मंदिर परिसर व जनसंपर्क कार्यालयात अनेक नेत्यांच्या नावाने ,बोगस खाजगी सचिवांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत चालला असून हे पीए दर्शन व आरती पास घेण्यासाठी नेहमी ठाण मांडून तेथे बसलेले दिसतात. यांच्याकडे कुठलेही अधिकृत ओळखपत्र नाही.
परंतु मी अमूक मंत्र्याचा, खासदाराचा तसेच आमदाराचा पीए आहे असं सांगून जनसंपर्क कार्यालयात एकप्रकारे हुकूमशाही करत आहे. तर साहेबांचे व्हीआयपी पाहुणे आहे असं सांगून त्या पाहुण्यांना थेट पास न काढता कुठलीही चेकिंग न करता मंदिरात जाऊन व्हीआयपी दर्शन तसेच आरतीचा लाभ करून देत आहे.
विशेष म्हणजे कोणताही सुरक्षा रक्षक त्यांच्याकडे पास आहे किंव्हा नाही हे तपासण्याची हिम्मत करत नाही .त्यामुळे या बोगस पीएंच्या टोळीची किती दहशत आहे हे लक्षात येते. वास्तविक केंद्रातील मंत्री,राज्यातील मंत्री, खासदार, आमदार, न्यायमूर्ती, आयएएस, आयपीएस अधिकारी यांना प्रोटोकॉल प्रमाणे जनसंपर्क कार्यालयामार्फत मोफत दर्शन करण्याची सुविधा आहे.
मात्र हा प्रोटोकॉल तोडून हे बोगस पीए अनेकांना दररोज व्हीआयपी दर्शन व आरतीचा लाभ उपलब्ध करून देत असून हे पाहुणे नेमकी मंत्र्यांचे, खासदारांचे, आमदारांचे की अन्य कोणाचे आहेत. हे आजवर कुणालाही माहीत होतं नाही. परंतु या व्हीआयपी दर्शनाच्या मार्फत पिएंचा मोठा आर्थिक फायदा त्यातून होत असून दर्शनाचा हा गोरख धंदा कायमचाच बंद करून अशा बोगस पिएंची चौकशी करून त्यांच्यावर करावाई करावी .
असे निवेदन शिर्डीतील ग्रामस्थांनी साई संस्थांनला दिले आहे. परंतु साई संस्थानमधीलच अनेक प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी संस्थांनच्या नियमांचे उल्लंघन करून आपल्या अधिकाराचा गैरवापर करून त्यांच्या मार्जितील पाहुण्यांना, मित्र मंडळींना कोणताही पास काढता थेट मंदिरात जाऊन दर्शनरांग थांबवून आपल्या पाहुण्यांना व्हीआयपी दर्शन घडवून आणतात व वरून त्यांचा सत्कारही मंदिर कार्यालयात करतात.
त्यामुळे आता संस्थान प्रशासन नेमकी कुणावर कारवाई करणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या बोगस पिएंच्या हातात लाखो रुपयांचे दोन दोन आय फोन असतात. तर हे दिवसभर जनसंपर्क कार्यालय तसेच मंदिर परिसरात घुटमळत असतात यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून यांच्यामार्फत सुरु असलेल्या साईराम मुळे शिर्डीची आणि साई संस्थांनची बदनामी होत आहे.
यावर वेळीच नियंत्रण व पायबंद बसला नाही तर यांच्यामुळे दर्शनाचा काळा बाजार उदयास येऊन पुन्हा गुन्हेगारी वाढू शकते हे नाकारून चालणार नाही. आता ह्या बोगस पिएंची चौकशी होऊन त्यांच्यावर करावाई होणार का? अशी चर्चाही शिर्डीत ग्रामस्थ व सर्वसामान्य साई भक्तांमधूनही होत आहे.