सावळीविहीर फाटा | प्रतिनिधी :
सावळीविहीर फाटा ते अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६०च्या दुरवस्थेचा प्रश्न आता थेट शासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेवर बोट ठेवणारा ठरला आहे. गेल्या तब्बल दोन दशकांपासून या महामार्गाची दुरवस्था कायम असताना सत्ताधारी मंत्री बदलले, सरकारे बदलली, राजकीय पिढ्या बदलल्या; मात्र रस्त्याची अवस्था बदलली नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत संजय बबुताई भास्करराव काळे यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.
‘मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत आल्या, पण जिल्ह्याचा रस्ता अजूनही नागडा!’
सन २००६ मध्ये रस्त्यालगतची मोठमोठी वटवृक्ष तोडून रस्ता बोडखा करण्यात आला. त्यानंतर तब्बल २० वर्षांचा कालावधी लोटला. या काळात राज्याच्या राजकारणात अनेक चेहरे सत्तेवर आले, मंत्र्यांची राजकीय ताकद वाढली, अनेकांच्या पुढच्या पिढ्याही राजकारणात सक्रिय झाल्या; मात्र सावळीविहीर फाटा ते अहिल्यानगर महामार्गाची दुरवस्था दूर करण्यासाठी ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना झाल्या नाहीत, असा आरोप काळे यांनी केला आहे.
‘शासनाने आमचे जवानीपासून म्हातारपण पाहिले; पण रस्ता दुरुस्त केला नाही. आमच्या तालुक्यातील जनतेला रोज या रस्त्यावरून हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. मंत्री मोठे झाले, त्यांची तिसरी पिढी सत्तेत आली; पण जिल्ह्याचा रस्ता मात्र नागडाच राहिला,’ अशा शब्दांत काळे यांनी शासनाच्या कारभारावर जोरदार प्रहार केला आहे.
‘मीही नागड्यांचा प्रतिनिधी; म्हणून नागडाच चालणार!’
रस्त्याच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काळे यांनी ‘विवस्त्र शासकीय वारी’ काढण्याची घोषणा केली आहे. ते २५ ऑगस्टपासून सावळीविहीर फाटा ते अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय असा सुमारे आठ दिवसांचा पायी प्रवास करणार आहेत.
‘नागड्या जिल्ह्याचा प्रतिनिधी नागडाच चालणार. जनतेची लाज म्हणून कंबर झाकणार,’ असे सांगत काळे यांनी या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली आहे.
विशेष म्हणजे काळे यांचे वय ६४ वर्षे असून त्यांच्या गुडघ्यांचे लिगामेंट खराब असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तरीदेखील पुढच्या पिढीला चांगले रस्ते मिळावेत, राष्ट्र प्रगत व्हावे आणि साईबाबांच्या चरणी येणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुरक्षित व दर्जेदार व्हावा, या उद्देशाने आपण हा संघर्ष करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आठ दिवसांचा पायी प्रवास; रोज सकाळी ९ वाजता सुरुवात
काळे यांच्या नियोजित आंदोलनानुसार पहिल्या दिवशी २५ ऑगस्ट रोजी सावळीविहीर फाटा ते राहाता, दुसऱ्या दिवशी २६ ऑगस्ट रोजी राहाता ते बाभळेश्वर, तिसऱ्या दिवशी २७ ऑगस्ट रोजी बाभळेश्वर ते कोल्हार, चौथ्या दिवशी १ सप्टेंबर रोजी कोल्हार ते राहुरी फॅक्टरी, पाचव्या दिवशी २ सप्टेंबर रोजी राहुरी फॅक्टरी ते राहुरी विद्यापीठ, सहाव्या दिवशी ३ सप्टेंबर रोजी राहुरी ते देहरे, सातव्या दिवशी ४ सप्टेंबर रोजी देहरे ते एमआयडीसी आणि आठव्या दिवशी ५ सप्टेंबर रोजी एमआयडीसी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा प्रवास करण्यात येणार आहे.
दररोज सकाळी ९ वाजता पायी प्रवासाला सुरुवात करण्यात येणार असून, या संपूर्ण प्रवासात रस्त्याची प्रत्यक्ष दुरवस्था जनतेसमोर मांडण्यात येणार असल्याचे काळे यांनी सांगितले.
‘लाज असेल तर रस्त्याचे मालक भेटायला येतील!’
या आंदोलनातून काळे यांनी थेट शासन, संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींना आव्हान दिले आहे. ‘लाज असेल तर रस्त्याचे मालक मला भेटायला येतील,’ असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दररोजचा प्रवास हा केवळ पदयात्रा नसून रस्त्याच्या दुरवस्थेचा जिवंत पंचनामा ठरेल, असा दावा त्यांनी केला आहे. आठ दिवसांच्या या प्रवासातून शासनाने रस्त्याची प्रत्यक्ष अवस्था पाहावी आणि जबाबदार मंत्र्यांनी व संबंधित अधिकाऱ्यांनी जनतेला उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आता प्रश्न एवढाच—२० वर्षे रस्ता दुरुस्त न करणाऱ्या शासनाला ६४ वर्षीय नागरिकाची ही ‘विवस्त्र शासकीय वारी’ तरी जागे करणार का? की मंत्री आणि अधिकारी पुन्हा एकदा या महामार्गाच्या खड्ड्यांइतक्याच खोल शांततेत राहणार?