
शिर्डी-नाशिक महामार्गावरील सावळी भीर परिसरात झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. राज्य परिवहन महामंडळाची बस आणि अर्टिगा कार यांच्यात समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत राहाता येथील विशाल काशिनाथ कांबळे (४३) व महेश काशिनाथ कांबळे (४०) या सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले.
प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर जखमींना मदत करण्याचे नैतिक कर्तव्य असताना बसचालक घटनास्थळावरून निघून गेल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर काही काळ घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी प्रवासी मदतीसाठी आक्रोश करत होते.
मात्र, अपघाताची माहिती मिळताच शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कोणतीही वेळ न दवडता
स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना वाहनांमधून बाहेर काढले आणि त्वरित उपचारासाठी रवाना केले.
पोलीस पथकाने जखमींना पोलिसांच्या वाहनातून तसेच रुग्णवाहिकांच्या सहाय्याने साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमींना वेळेत उपचार मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला. या संपूर्ण बचावकार्यात पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता अनेकांसाठी माणुसकीचे जिवंत उदाहरण ठरली.
स्थानिक नागरिकांनीही पोलीस निरीक्षक रणजित गलांडे व त्यांच्या पथकाच्या कार्याचे कौतुक केले. “अपघातानंतर पोलिसांनी केवळ कायद्याची जबाबदारी पार पाडली नाही, तर माणुसकीचे कर्तव्यही निभावले,” अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शिर्डी पोलीस पुढील तपास करत आहेत. या दुर्घटनेत दोन कुटुंबांचा आधार हरपला असला, तरी वेळेवर धावून आलेल्या पोलिसांमुळे अनेक जखमींना नवजीवन मिळाल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.
तत्पर पोलीस ठरले देवदूत
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ बाहेर काढले. पोलिसांच्या वाहनांसह रुग्णवाहिकांमधून जखमींना साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांच्या तत्परतेमुळे अनेक जखमींना वेळेत उपचार मिळाले आणि संकटाच्या क्षणी पोलिसांनी माणुसकीचा आदर्श घालून दिला.

