शिर्डी : “गोविंदा आला रे आला…”च्या जयघोषाने शिर्डी शहर दुमदुमले आणि थरावर थर रचत चिमुकल्या गोविंदांनी दहीहंडी फोडण्याचा थरार अनुभवला. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शिर्डीत साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवाला यंदाही मोठा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला.
शिर्डीतील सनमित्र युवक मंडळ आणि क्रांती तरुण मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या दहीहंडी उत्सवाची परंपरा यंदाही दिमाखात कायम ठेवण्यात आली. श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे आणि गजानन शेरवेकर यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव उत्साहात पार पडला.
आज दक्षिणमुखी मारुती मंदिर येथे दहीहंडीचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर ढोल-ताशांचा गजर, डीजेचा दणदणाट आणि “गोविंदा… गोविंदा…”च्या घोषणांनी परिसर अक्षरशः दुमदुमून गेला.
दहीहंडी नव्हे, शिस्तीची परंपरा!
विशेष म्हणजे, शिर्डीत दहीहंडी उत्सवाची परंपरा फारशी प्रचलित नसताना सनमित्र आणि क्रांती मंडळांनी अनेक वर्षांपूर्वी या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. त्या काळापासून आजपर्यंत या दोन्ही मंडळांनी दहीहंडीला केवळ मनोरंजनाचा उत्सव न ठेवता शिस्त, एकजूट आणि कौशल्याचा उत्सव म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे.
गोविंदांच्या थरांची उंची वाढत असताना खालील गोविंदांचा मजबूत पाया आणि वर चढणाऱ्या गोविंदांचे संतुलन यामुळे उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकत होता. चिमुकल्या गोविंदांनी उंच थरावर जात हंडी फोडताच एकच जल्लोष झाला.
जात-पात, पक्षभेद विसरून एकच नारा… ‘गोविंदा आला रे!’
या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे कोणाचा मोठेपणा नाही, कोणाचा भेदभाव नाही; सर्व गोविंदा एकत्र येतात आणि एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून विजयाचा थर उभा करतात.
वय, मतभेद आणि राजकीय भेद बाजूला ठेवून तरुणाई एका छताखा एकत्र येते. त्यामुळे दहीहंडी हा केवळ हंडी फोडण्याचा खेळ न राहता एकता, बंधुभाव आणि सांघिक शक्तीचा उत्सव बनला आहे.
सनमित्र युवक मंडळ आणि क्रांती तरुण मंडळाने वर्षानुवर्षे जपलेली ही परंपरा यंदाही शिर्डीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात दिमाखात पार पडली.