
कोपरगाव | प्रतिनिधी
राज्य शासनाने राज्यातील वापरात नसलेली व अत्यल्प क्षमतेने चालणारी ८० दुय्यम कारागृहे कायमस्वरूपी बंद करण्याचा घेतलेला निर्णय आता प्रत्यक्षात उतरू लागला आहे. त्याच अनुषंगाने गुरुवार (२ जुलै) रोजी कोपरगाव येथील दुय्यम कारागृहातील २० कैद्यांना कडेकोट पोलीस बंदोबस्तात नाशिक मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले. या प्रक्रियेनंतर अनेक वर्षांचा इतिहास असलेल्या कोपरगावच्या दुय्यम कारागृहाला प्रत्यक्षात टाळे लागले.
सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पोलीस वाहनांच्या ताफ्यातून कैद्यांची रवानगी करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संपूर्ण स्थलांतर प्रक्रिया शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आली.
राज्य शासनाने १२ जून २०२६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील महसूल विभागाकडील ११६ दुय्यम कारागृहांपैकी ८० कारागृहे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक कारागृहांचा वापर अत्यल्प असल्याने, काही इमारती जीर्ण व मोडकळीस आल्याने तसेच त्यांच्या देखभाल, दुरुस्ती व सुरक्षेवर होणारा वाढता खर्च लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
या धोरणानुसार संबंधित भागातील कैद्यांची व्यवस्था जवळच्या जिल्हा अथवा मध्यवर्ती कारागृहात करण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून कोपरगाव येथील सर्व २० कैद्यांना नाशिक मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले.
कारागृह विभागाच्या मते, या निर्णयामुळे उपलब्ध मनुष्यबळ, सुरक्षा यंत्रणा आणि इतर संसाधनांचा अधिक परिणामकारक वापर होणार असून प्रशासनाच्या कामकाजात अधिक सुसूत्रता येईल. तसेच कारागृह विभागावरील आर्थिक भारही मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, कोपरगावच्या दुय्यम कारागृहाला टाळे लागल्यानंतर या शासकीय जागेचा भविष्यात कोणत्या कामासाठी वापर केला जाणार, याकडे नागरिकांसह स्थानिक प्रशासनाचे लक्ष लागले आहे. शासन या जागेचा सार्वजनिक हितासाठी पुनर्वापर करणार की अन्य शासकीय कार्यालयासाठी उपलब्ध करून देणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

