जिल्ह्यात वाढत्या भटक्या प्राण्यांच्या समस्येमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून नागरिकांच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या प्राणीक्लेशासंबंधीच्या निर्देशांची शहरी तसेच ग्रामीण भागात काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत. यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचा सर्वसमावेशक अॅक्शन प्लॅन
१. नागरिकांची सुरक्षा प्रथम !
महामार्ग व प्रमुख रस्त्यांवर भटक्या जनावरांच्या हालचालीमुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. संबंधित विभागांना नियमित गस्त, तपासणी व प्राणी पकड मोहीम चालवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
२. तात्काळ मदतीसाठी ‘हेल्पलाईन’
रस्त्यावर भटकी जनावरे दिसल्यास, एखादा अपघात झाल्यास किंवा तक्रार नोंदवायची असल्यास नागरिकांसाठी विशेष ‘महामार्ग हेल्पलाईन’ सुरू करण्यात येणार आहे. यामुळे तत्पर प्रतिसाद मिळून अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे.
३. रेबीज लसींचा पुरेसा साठा – आरोग्याचे मजबूत कवच
प्रत्येक शासकीय व खाजगी रुग्णालयात रेबीज विरोधी लसी उपलब्ध ठेवण्याची दक्षता घेण्यात आली आहे. नागरिकांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी आरोग्य विभागाला सज्जतेचे आदेश.
४. भटक्या श्वानांचे लसीकरण व निर्बिजीकरण
भटक्या श्वानांचे लसीकरण, निर्बिजीकरण आणि त्यांच्यासाठी निवारा उपलब्ध करण्यासाठी नगरपरिषद, ग्रामपंचायती व पशुसंवर्धन विभाग संयुक्तपणे मोहीम राबवणार. प्राणी कल्याणाच्या सर्व मानकांचे पालन सुनिश्चित केले जाईल.
५. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे 100% पालन
प्राणीसंवर्धन व प्राणीक्लेश प्रतिबंधक कायद्याच्या सूचनांचे जिल्ह्यात काटेकोर पालन करण्यासाठी वेळबद्ध अॅक्शन प्लॅन लागू केला जाईल. कोणत्याही प्रकारची ढिलाई सहन केली जाणार नाही, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाची प्रस्तुती
जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षा आणि प्राणी कल्याण या दोन्हींचा समतोल राखत, भटक्या प्राण्यांच्या समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

