अंतरवाली सराटी, जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. मराठा समाजाच्या दृष्टीने सरकारला शक्य असलेले निर्णय घेतले असून, आता मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करावे, अशी भूमिका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडली. त्याचवेळी, जरांगे पाटील यांच्याशी सरकारी शिष्टमंडळ आता चर्चा करणार नसल्याचेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
विखे पाटील यांच्या या भूमिकेने जरांगे पाटील चांगलेच संतापले. त्यांनी विखे पाटील यांच्यावर थेट आणि आक्रमक शब्दांत टीका केली. ‘तुला अंतरवालीला कोणी बोलावलं होतं? तू आला नाही तरी आम्हाला काही फरक पडत नाही. तूच मराठा समाजाचं वाटोळं केलं,’ अशा शब्दांत जरांगे यांनी विखेंना लक्ष्य केले.

इतकेच नव्हे, तर मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीच्या अध्यक्षपदावरूनही जरांगे यांनी विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला. ‘मराठा उपसमितीचा आतापर्यंतचा सर्वात निष्क्रिय अध्यक्ष’ असल्याचा आरोप त्यांनी केला.
सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्याचा दावा विखे पाटील यांनी केला असला, तरी जरांगे पाटील यांनी सरकारची भूमिका मान्य करण्यास नकार दिल्याने आरक्षणाचा संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. एकीकडे सरकारकडून ‘आता चर्चा नाही’ असा कठोर पवित्रा घेतला जात आहे, तर दुसरीकडे जरांगे पाटील यांनीही सरकारच्या भूमिकेवर जोरदार प्रहार केला आहे.
त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सरकार विरुद्ध जरांगे असा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
