
शिर्डी : जगभरातील करोडो साईभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वाढता धुमाकूळ आता साईभक्तांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका बनला आहे. द्वारकामाई, चावडी, समाधी मंदिर परिसर, दर्शन रांगा तसेच प्रसादालय परिसरात कुत्र्यांची टोळकी मुक्तपणे फिरत असल्याने भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या गंभीर प्रकाराविरोधात हरिभाऊ गणपतराव कोते पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी व नगर परिषद प्रशासनाला जोरदार निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. “करोडो रुपयांचा कारभार करणाऱ्या प्रशासनाला साधा भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करता येत नसेल, तर ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे,” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मंदिर परिसरात लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग साईभक्तांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा कुत्रे भक्तांच्या अंगावर धावत जातात, दर्शन रांगांमध्ये घुसतात तसेच प्रसादाच्या ठिकाणी फिरताना दिसतात. रात्रीच्या वेळी भुंकून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण होत असून, साईभक्त भयभीत अवस्थेत दर्शन घेत आहेत.
“आज परिस्थिती त्रासदायक आहे; उद्या एखाद्या साईभक्तावर हल्ला झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा संतप्त सवाल हरिभाऊ कोते पाटील यांनी प्रशासनाला केला आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वीच मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, साईभक्तांमधूनही प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत असून, मंदिर परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी नगर परिषद, पशुवैद्यकीय विभाग व संस्थान प्रशासनाने संयुक्त विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.
साईभक्तांची सुरक्षा हीच खरी साईसेवा असल्याने प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलावीत, अन्यथा भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही अनुचित घटनेस संबंधित प्रशासनच जबाबदार राहील, असा इशाराही हरिभाऊ गणपतराव कोते पाटील यांनी दिला आहे.

