
शिर्डी : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे आणि अखंड धुनीच्या उष्णतेमुळे द्वारकामाई परिसरात निर्माण झालेल्या असह्य उकाड्याविरोधात आता साईभक्तांमधून तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर साईबाबांचे समकालीन निस्सीम भक्त तात्या पाटील कोते तथा बायजामाई कोते यांचे वंशज राजेंद्र सुभाषराव कोते पाटील यांनी चे कार्यकारी अधिकारी मा. गोरक्ष गाडीलकर यांना भावनिक निवेदन देत द्वारकामाईत तात्काळ एक्झॉस्ट फॅन व मोठ्या क्षमतेचे कुलर बसविण्याची मागणी केली आहे.
“द्वारकामाई हे केवळ मंदिर नसून करोडो साईभक्तांच्या श्रद्धेचे जिवंत केंद्र आहे. साईबाबांनी जवळपास ६० वर्षे वास्तव्य केलेल्या या पवित्र स्थळी भक्तांना उष्णतेमुळे त्रास सहन करावा लागणे अत्यंत वेदनादायी आहे,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
राजेंद्र कोते पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, पत्र्याच्या छतामुळे उष्णता अधिक वाढत असून, दर्शनासाठी तासनतास उभ्या असलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व दिव्यांग भक्तांची अवस्था अत्यंत हालाकीची होत आहे. अनेक भक्त घामाने व्याकुळ होत असून काहींना गुदमरल्यासारखे होत असल्याने उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. तरीही साईभक्त श्रद्धेपोटी शांतपणे दर्शन घेत असल्याचे चित्र पाहून भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे कोते परिवाराला साईबाबांना नैवेद्य दाखविण्याचा व पालखीचा मान लाभलेला असून, “साईभक्तांची सेवा हीच खरी साईसेवा” या भावनेतूनच आपण ही मागणी करत असल्याचे राजेंद्र कोते पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
देश-विदेशातून लाखो साईभक्त शिर्डीत दर्शनासाठी येत असताना द्वारकामाईत अद्ययावत वायुवीजन व्यवस्था नसणे ही प्रशासनासाठी गंभीर बाब असल्याची भावना भाविकांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे तात्काळ आधुनिक एक्झॉस्ट फॅन, औद्योगिक क्षमतेचे कुलर व योग्य वायुवीजन व्यवस्था बसवून भक्तांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, “साईभक्तांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने आता तरी तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा,” अशी अपेक्षा साईभक्तांकडून व्यक्त होत आहे.

