शिर्डी | प्रतिनिधी :
श्री साईबाबांच्या पालखी दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लंपास केल्याची धक्कादायक घटना शिर्डीत घडली आहे. पालखी रोडवरील चावडीसमोर हा प्रकार घडला. या घटनेत तब्बल १ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या दोन सोनसाखळ्या चोरीस गेल्या आहेत.
याप्रकरणी गोव्यातील रहिवासी रोशन रमाकांत अगरवाडेकर (वय ६०) यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. FIR क्रमांक ०६६६/२०२६ असा आहे.

पालखी दर्शन घेत असताना साडीचा पदर ओढला; गळ्यातील चैन गायब
फिर्यादी रोशन अगरवाडेकर या आपल्या मुलासह व कुटुंबीयांसोबत श्री साईबाबांच्या दर्शनासाठी २८ जुलै रोजी शिर्डीत आल्या होत्या. २९ जुलै रोजी सायंकाळी त्या श्री साईबाबांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी चावडीजवळ गेल्या असता मोठी गर्दी झाली होती.
पालखीचे दर्शन घेत असताना कोणीतरी त्यांच्या साडीचा पदर ओढल्याचे त्यांना जाणवले. त्यानंतर त्यांनी मागे येऊन पाहिले असता गळ्यातील ३० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आजूबाजूला शोध घेऊनही चैन मिळाली नाही.
दुसऱ्या महिलेचीही १८ ग्रॅमची सोनसाखळी चोरीला
याच गर्दीत यशोदा रामेश्वर ठाकरे (वय ४२, रा. दमोह, बालाघाट, मध्यप्रदेश) यांच्याही गळ्यातील १८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरीस गेल्याचे समोर आले. दोन्ही महिलांच्या सोनसाखळ्या एकाच पालखी दर्शनाच्या गर्दीत चोरीला गेल्याने अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत हात साफ केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
फिर्यादीनुसार, ३० ग्रॅम सोन्याच्या चैनची किंमत १ लाख २० हजार रुपये, तर १८ ग्रॅम सोन्याच्या चैनची किंमत ६५ हजार रुपये असून, दोन्ही मिळून १ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
भाविकांच्या गर्दीत सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट?
शिर्डीत दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. पालखी, उत्सव व धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी गर्दी आणखी वाढते. अशा गर्दीचा फायदा घेऊन सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे.
या घटनेतील अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, पालखी मार्ग व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास चोरट्यांचा माग काढण्यास मदत होण्याची शक्यता आहे. भाविकांनीही गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान दागिने परिधान करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
