
शिर्डी : अनुयायांच्या नावावर बनावट खाती उघडून लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा संशय व्यक्त होत असताना समता पतसंस्था थेट वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. या प्रकरणाने ‘भोंदू खरात’ नेटवर्कचे धागेदोरे उघड होण्याची शक्यता निर्माण झाली असून, शिर्डीत संतापाची लाट उसळली आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे – गुन्हा दाखल होऊनही संबंधित व्यवस्थापकावर अजून अटकेची कारवाई नाही! त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. “ही विलंबाची ढाल कोणासाठी?” असा थेट सवाल आता नागरिक विचारत आहेत.
तपासादरम्यान ४५ खातेदारांची चौकशी करण्यात आली असून, अनेकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले – “आम्ही कोणतेही खाते उघडलेले नाही.” या जबाबांमुळे बनावट कागदपत्रे, खोटे स्वाक्षऱ्या आणि आर्थिक व्यवहारांचा मोठा घोटाळा उघड होत असल्याची शक्यता बळावली आहे.
या प्रकरणात केवळ कर्मचारीच नव्हे तर वरच्या स्तरावरील जबाबदारांपर्यंत तपास नेण्याची गरज व्यक्त होत आहे. त्यामुळे समता पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांच्यावरही थेट गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आता तीव्र झाली आहे.
दरम्यान, ‘भोंदू खरात’ प्रकरणाशी या घोटाळ्याचे संबंध असल्याच्या चर्चेमुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. आर्थिक गैरव्यवहार, बनावट खाती आणि संभाव्य मनी ट्रेल यामुळे संपूर्ण यंत्रणाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
📢 संतप्त नागरिकांचे थेट प्रश्न:
👉 ४५ लोकांच्या नावावर खाती उघडलीच कशी?
👉 खातेदारांना न कळता व्यवहार कोणी केले?
👉 गुन्हा दाखल असूनही अटक का नाही?
👉 “समता”ला संरक्षण कोण देतंय?
⚠️ इशारा स्पष्ट:
जर तात्काळ कठोर कारवाई झाली नाही, तर हे प्रकरण केवळ आर्थिक घोटाळा न राहता जनआंदोलनात रूपांतरित होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
👉 जनतेची मागणी एकच – “मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक करा, अन्यथा रस्त्यावर उतरू!”

