
शिर्डी : येथील गाजलेल्या जमीन अपहार व सावकारी प्रकरणातील मुख्य आरोपी तथा कॅप्टन खरात याची पत्नी कल्पना खरात ही तब्बल दीड महिन्यांपासून फरार असून, शिर्डी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना तिला अटक करण्यात अद्यापही अपयश येत असल्याने संपूर्ण तपास प्रक्रियेवरच संशयाची नजर फिरू लागली आहे.
कॅप्टन खरात याला अटक झाल्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले होते. मात्र, पोलीस कोठडीत असताना कॅप्टन खरात तपास यंत्रणांपासून महत्त्वाची माहिती लपवत असल्याची चर्चा सुरू असतानाच, दि. ३० मार्च रोजी पोलिसांनी खरात यांच्या बंगल्यावर धाड टाकली. मात्र त्याचवेळी कल्पना खरात ही घरातून रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याचे समोर आले.
विशेष म्हणजे, कल्पना खरात ही कुठली नामचीन किंवा अट्टल गुन्हेगार नसताना देखील पोलीसांना तिचा मागमूस लागत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संशय व्यक्त केला जात आहे. “राज्यातील मोठमोठे गुंड आणि सराईत आरोपी काही तासांत पोलिसांच्या ताब्यात येतात, मग कल्पना खरातच पोलिसांना का सापडत नाही?” असा संतप्त सवाल आता नागरिक उघडपणे उपस्थित करू लागले आहेत.
सुरुवातीला मोठ्या गाजावाजात सुरू झालेल्या खरात प्रकरणाचा तपास आता हळूहळू थंडबस्त्यात जात असल्याचे चित्र दिसत आहे. तपास यंत्रणांची सुरुवातीची आक्रमकता कमी झाल्याचे बोलले जात असून, “हे प्रकरण लवकर मिटवण्याचा प्रयत्न सुरू आहे का?” अशीही चर्चा रंगू लागली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, कॅप्टन खरात याचे विविध क्षेत्रातील काही उच्चपदस्थांशी निकट संबंध असल्याची चर्चा असून, त्यामुळंच तपासाची गती मंदावली असल्याचा आरोप होत आहे. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे चर्चेत असल्याने तपास अधिक खोलात गेल्यास अनेकांच्या खुर्च्या धोक्यात येऊ शकतात, अशीही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणात ईडीनेही एन्ट्री घेत राहत पतसंस्था तसेच मारी गोल्ड हॉटेलच्या आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे तपासल्याची माहिती समोर आली होती. मात्र त्यानंतर तपास नेमका कुठपर्यंत पोहोचला, कोणावर काय कारवाई झाली, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
त्यामुळे सध्या कॅप्टन खरात प्रकरणात संशय, शांतता आणि पडद्यामागील हालचाली यांचंच गूढ अधिक गडद होत चालल्याचे चित्र दिसत आहे.

