
पानमाळा परिसर हादरला; लोखंडी रॉड आणि चाकू घेऊन आलेल्या टोळीचा धुमाकूळ
साईनगरी शिर्डीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून भरदिवसा एका दुकानदारावर तिघा अज्ञात हल्लेखोरांनी सशस्त्र हल्ला केल्याने शहरात भीतीचे सावट पसरले आहे. पानमाळा परिसरात दुपारच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेत विकास जयसवाल याच्यावर लोखंडी रॉडने अमानुष मारहाण करण्यात आली, तर चाकूने गळा चिरण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
“धक्का देऊन खाली पाडलं अन् थेट डोक्यावर वार”मिळालेल्या माहितीनुसार, विकास जयसवाल हा नेहमीप्रमाणे आपल्या कामात व्यस्त असताना अचानक स्कुटीवरून आलेल्या तिघांनी त्याला लक्ष्य केले. सुरुवातीला आरोपींनी जोराचा धक्का देत त्याला रस्त्यावर पाडले आणि त्यानंतर हातातील लोखंडी रॉडने डोक्यावर व शरीरावर सपासप वार सुरू केले. परिसरातील नागरिक काही समजून घेण्याच्या आतच आरोपींनी चाकू काढून त्याच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. भररस्त्यात सुरू असलेल्या या रक्तरंजित थरारामुळे नागरिकांमध्ये एकच घबराट उडाली.
महिलेच्या धाडसामुळे टळली मोठी दुर्घटना
घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका महिलेने जीवाची पर्वा न करता आरोपीच्या हातातील चाकू हिसकावून घेत आरडाओरड केली. अचानक झालेल्या या प्रतिकारामुळे हल्लेखोर गोंधळले आणि तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. नागरिकांनी तत्काळ जखमी विकास जयसवाल याला साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
शिर्डीत गुन्हेगारांचा वाढता हैदोस; पोलिसांसमोर मोठे आव्हान
या घटनेनंतर शिर्डी शहरात संतापाची लाट उसळली असून “भरदिवसा दुकानदार सुरक्षित नसेल तर सामान्य नागरिकांनी जगायचं कसं?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. हल्लेखोर कोण होते, त्यांचा उद्देश काय होता, पूर्ववैमनस्य होते का, की यामागे मोठा कट आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मात्र साईनगरीत दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

