
गोरगरिबांच्या झोपड्यांवर बुलडोझर, पण अवैध दारू विक्रेत्यांवर मेहरबानी का?; शिर्डीकरांचा संतप्त सवाल
शिर्डी प्रतिनिधी :- शिर्डी शहरात अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट झाला असून प्रशासन मात्र केवळ दिखाऊ कारवाया करून स्वतःची पाठ थोपटून घेत असल्याची तीव्र भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. काल दारूबंदी विभाग, शिर्डी पोलीस स्टेशन आणि नगर परिषदेच्या पथकाने एका अवैध दारू अड्ड्यावर छापा टाकून तीन आरोपींना ताब्यात घेतले. मात्र, संपूर्ण शहरात तब्बल ३० हून अधिक ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू असताना केवळ एकाच अड्ड्यावर कारवाई झाल्याने ही कारवाईही केवळ “दिखावा” असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
विशेष म्हणजे, शिर्डी पोलीस स्टेशनने नगर परिषदेला लेखी पत्र देऊन शहरातील अवैध दारू विक्रीची अतिक्रमणे तात्काळ हटविण्याची मागणी केली होती. त्यानुसार नगर परिषद प्रशासनाने मागील महिन्यात सुमारे ३० अवैध दारू विक्रेत्यांना नोटिसा बजावत ३० दिवसांच्या आत अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. मुदत संपल्यानंतर नगर परिषद स्वतः कारवाई करेल, असेही नोटिशीत स्पष्ट करण्यात आले होते.
मात्र, नोटिशीची मुदत संपूनही एकाही अवैध दारू अड्ड्यावर बुलडोझर फिरलेला नाही. उलट एकाच अड्ड्यावर कारवाई करून संपूर्ण शहरात मोठी मोहीम राबवल्याचा आव आणला जात असल्याने मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
शहरातील गोरगरिबांच्या झोपड्या पाडण्यासाठी तत्पर असलेले नगर परिषद प्रशासन अवैध दारू विक्रेत्यांच्या अतिक्रमणांवर मात्र कारवाई करण्यास का टाळाटाळ करत आहे? या दारू माफियांना नेमके कोणाचे संरक्षण आहे? मुख्याधिकारी यांच्यावर कोणाचा दबाव आहे का? असे संतप्त सवाल आता शिर्डीकर उपस्थित करू लागले आहेत.
नोटिसा दिल्या, पण कारवाई शून्य!
नगर परिषदेकडून ३० अवैध दारू विक्रेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या. मात्र मुदत संपूनही कारवाई झाली नाही. त्यामुळे या नोटिसा केवळ कागदी घोडे ठरल्या की काय, अशी चर्चा शहरात सुरू असून सर्व अवैध दारू अड्डे तात्काळ जमीनदोस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
दौंडमध्ये एमपीडीए, शिर्डीत केवळ नोटिसांचा फार्स?
पुणे ग्रामीण पोलिसांनी दौंडमध्ये हातभट्टी विक्रेत्याला एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध केले. मात्र, दारूबंदी असलेल्या शिर्डीत अवैध दारू विक्रेत्यांवर केवळ नोटिसांचा पाऊस पडतो, प्रत्यक्ष कारवाई मात्र होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
अवैध धंद्यांवरील कारवाईबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात कायमच संशयाचे वातावरण असते. अनेक प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष व्यवसायाचे सूत्रधार पडद्यामागेच राहतात, तर कारवाईच्या नावाखाली केवळ कामगार, नोकर अथवा किरकोळ भूमिकेतील व्यक्तींना आरोपी करण्यात येते, अशी चर्चा नागरिकांमध्ये नेहमीच ऐकायला मिळते.
त्यामुळे अवैध दारू व्यवसायामागील खरे सूत्रधार कोण आहेत, त्यांच्यापर्यंत तपासाची साखळी पोहोचते का, तसेच त्यांच्यावरही समान कठोर कारवाई होते का, याबाबत प्रशासनाने पारदर्शक भूमिका घेणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.
तसेच कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेला दारूचा साठा, रसायने व इतर साहित्य नियमांनुसार नष्ट केले जाते का, त्याची अधिकृत नोंद व पंचनामे जनतेसमोर येतात का, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.

