

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डीत देशविदेशातून येणार्या साईभक्तांच्या कोट्यावधी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या, मोबाईल आणि पाकिटांच्या चोरीच्या घटनांनी उच्चांक गाठला असताना या गुन्ह्यांचा छडा लावण्यात अपयशी ठरलेल्या तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्याकडेच आता साईबाबा मंदिर सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात आल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात चोरीच्या घटना वाढल्या, आरोपी मोकाट राहिले आणि पीडित भाविकांना न्याय मिळाला नाही, त्याच अधिकाऱ्यांकडे मंदिर सुरक्षा सोपविण्याचा निर्णय नेमका कोणत्या निकषावर घेण्यात आला, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
चोरटे मोकाट, तपास ठप्प, भाविक हवालदिल
गेल्या वर्षभरात शिर्डीत परराज्यातील अनेक भाविकांचे कोट्यावधी रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास झाले. अनेक गुन्ह्यांमध्ये सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होते, संशयितांच्या हालचालीही स्पष्ट दिसत होत्या. मात्र तपासाची गाडी पुढे सरकली नाही. आरोपी गजाआड झाले नाहीत, मुद्देमाल परत मिळाला नाही आणि चोरीच्या घटना थांबल्या नाहीत.
यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास क्षमतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. “चोर पकडता आले नाहीत, पण जबाबदारी मात्र वाढली,” अशी उपहासात्मक चर्चा आता शिर्डीत सुरू आहे.
भाविकांच्या सुरक्षेपेक्षा आकडेवारी महत्त्वाची?
शिर्डीत येणारा भाविक श्रद्धा आणि विश्वास घेऊन येतो. मात्र मंदिर परिसर, रांगा, लॉज आणि गर्दीच्या ठिकाणी चारचाकी वहणा मध्ये होणाऱ्या चोऱ्यांमुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या, सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली; तरीही ठोस परिणाम दिसून आला नाही.
ही बदली की अपयशावर पडदा?
कबाडी यांच्याकडे मंदिर सुरक्षेची जबाबदारी सोपवल्यानंतर आता एकच प्रश्न विचारला जात आहे — चोरी रोखण्यात आणि आरोपी पकडण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्याला नव्या जबाबदारीच्या माध्यमातून अभय दिले जात आहे का?
जर चोरीच्या गुन्ह्यांचा तपास यशस्वी झाला असता, आरोपी तुरुंगात गेले असते आणि भाविकांचा मुद्देमाल परत मिळाला असता, तर आज ही चर्चा झाली नसती. मात्र वास्तव वेगळे असल्याने या नियुक्तीबाबत संशय आणि नाराजी व्यक्त होत आहे.
साईनगरीच्या प्रतिमेला धक्का
देशभरातील कोट्यवधी भाविकांची श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीत भाविकांची सुरक्षा धोक्यात येणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. चोरीच्या घटना वाढत असताना आणि तपासात यश न मिळत असताना संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणे अपेक्षित होते. उलट त्यांच्याकडेच मंदिर सुरक्षेची धुरा सोपविल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
साईभक्त विचारत आहेत — “चोरी रोखण्यात अपयशी ठरलेले अधिकारी मंदिराची सुरक्षा कशी सांभाळणार?”
या प्रश्नाचे उत्तर आता कृतीतूनच द्यावे लागणार आहे. अन्यथा भाविकांचा संताप आणि अविश्वास आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

