
शिर्डीत विनापरवाना आम पापड विक्रीचा सुळसुळाट?; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप
शिर्डी (प्रतिनिधी) : जागतिक कीर्तीचे तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी शहरात विनापरवाना आणि संशयास्पद दर्जाचे खाद्यपदार्थ विक्री होत असल्याचा गंभीर प्रकार समोर येत असून, यामुळे नागरिक आणि साईभक्तांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील बाजारपेठ परिसरात अनेक वर्षांपासून काही परराज्यातील विक्रेते आम पापडाची विक्री करत असल्याची चर्चा असून, या उत्पादनांची गुणवत्ता, उत्पादन परवाना आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन केले जाते का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विक्री होणारे आम पापड उघड्यावर ठेवले जातात. या उत्पादनांवर उत्पादन दिनांक, कालबाह्यता दिनांक, उत्पादकाचे नाव, एफएसएसएआय (FSSAI) परवाना क्रमांक आदी आवश्यक माहिती अनेकदा आढळत नसल्याची तक्रार आहे. अशा परिस्थितीत हे पदार्थ नेमके कुठे आणि कोणत्या परिस्थितीत तयार केले जातात, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
याचबरोबर शहरात काही ठिकाणी निष्कृष्ट दर्जाचे समोसे, इडली-सांबार आणि इतर खाद्यपदार्थांचीही विक्री सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेषतः भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता, कमी खर्चात अधिक नफा कमावण्याच्या उद्देशाने निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकले जात असल्याचा आरोप होत आहे. अशा पदार्थांमुळे अन्न विषबाधा, पोटाचे विकार आणि इतर आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शिर्डी हे दररोज हजारो साईभक्त भेट देणारे धार्मिक स्थळ असल्याने येथील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे. बाजारपेठेतील दुकानदारांसह अनेक साईभक्त हे आम पापड आणि इतर खाद्यपदार्थ खरेदी करत असल्याने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी होत आहे.
नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन विभागाने तातडीने शिर्डी शहरात विशेष तपासणी मोहीम राबवावी, संबंधित विक्रेत्यांकडे आवश्यक परवाने आहेत का याची चौकशी करावी तसेच संशयास्पद खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवावेत, अशी मागणी केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाल्यासच नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा कथित खेळ थांबेल, अशी भावना व्यक्त होत आहे.
अन्न व औषध प्रशासन कारवाई करणार का?
शिर्डीसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तीर्थक्षेत्रात विनापरवाना आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारींमुळे अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित विभागाने तात्काळ छापेमारी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

