
गणेशवाडीत दोन शिवसैनिक गट आमनेसामने; पोलिसांच्या धडक हस्तक्षेपाने तणाव निवळला!
वैयक्तिक जागेच्या वादातून शिर्डीत मोठा गोंधळ
शिर्डी शहरातील उपनगर गणेशवाडी परिसरात काल सायंकाळी दोन गटांमध्ये जागेच्या बांधावरून झालेला किरकोळ वाद काही वेळातच मोठ्या तणावात बदलल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे या दोन्ही गटांचे नेतृत्व एका मोठ्या राजकीय पक्षाच्या जिल्हाप्रमुखांकडे असल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. शेकडो तरुण अचानक भर रस्त्यावर जमा झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
प्लॉटिंग, जागेचा बांध आणि थेट रस्त्यावर शक्तीप्रदर्शन
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित परिसरात एका गटाकडून प्लॉटिंग करून सुसज्ज प्लॉट विक्री सुरू आहे. तर दुसऱ्या गटाकडून जागेच्या बांधावर आक्षेप घेतला जात असल्याने दोन्ही बाजूंमध्ये जोरदार बाचाबाची झाली. काही मिनिटांतच हा वाद दोन गटांतील शक्तीप्रदर्शनात बदलत असल्याचे दिसून आले. मोठ्या लोकवस्तीच्या भागात एवढा मोठा जमाव जमल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे निर्माण झाली होती.
“हा जमाव कशासाठी?” — पो.निरीक्षक रणजित गलांडे ॲक्शन मोडमध्ये
घटनास्थळी तातडीने दाखल झालेल्या शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी परिस्थितीचा ताबा घेत दोन्ही गटांना कडक शब्दांत फैलावर घेतले. “वाद असेल तर पोलीस स्टेशनला येऊन कायदेशीर बाजू मांडा, भर रस्त्यात जमाव करून काय दाखवता?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थितांना केला. त्यानंतर पोलिस यंत्रणा आणि MSF जवानांना आदेश देताच काही मिनिटांत संपूर्ण जमाव पांगवण्यात आला.
पुन्हा गर्दी जमवली तर थेट गुन्हे दाखल; पोलिसांचा इशारा
दोन्ही गटांना शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून आपली बाजू मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पुन्हा अशाप्रकारे बेकायदेशीर गर्दी करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा स्पष्ट इशाराही पोलिसांनी दिला आहे.
दरम्यान, दुसऱ्या गटातील प्रमुख व्यक्ती जमावाच्या वेळी घटनास्थळी पोहोचली नसल्याने संभाव्य मोठा संघर्ष टळल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. पोलिसांची योग्यवेळी झालेली एन्ट्री आणि पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी घेतलेली ठाम भूमिका यामुळे गणेशवाडी परिसरातील वातावरण अखेर शांत करण्यात यश आले.

