
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांची अखेर बदली करण्यात आल्याने पोलीस वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात वाढत चाललेल्या वादामुळे तसेच तपासाच्या कार्यपद्धतीवर उपस्थित झालेल्या प्रश्नांमुळे ही बदली झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
गर्भलिंग चाचणी व फसवणूक प्रकरणामुळे वाढला दबाव
अशोक खरात याच्याशी संबंधित गर्भलिंग चाचणी, महिलांवरील अत्याचार तसेच आर्थिक व्यवहारांच्या अनेक गंभीर प्रकरणांमुळे राज्यभरात संतापाची लाट निर्माण झाली होती. या प्रकरणातील तपासावर अनेक सामाजिक संघटना, पत्रकार तसेच नागरिकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. काही आरोपींना मिळणाऱ्या कथित संरक्षणावरूनही पोलीस प्रशासनावर टीका होत होती.
कारवाईसाठी जनतेचा वाढता दबाव
या प्रकरणात निष्पक्ष तपास व्हावा, संबंधित आरोपींवर कठोर कारवाई व्हावी तसेच तपासात ढिलाई करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी सातत्याने होत होती. विशेषतः सामाजिक माध्यमांवर आणि विविध निवेदनांमधून जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
बदलीनंतर पोलीस विभागात चर्चांना उधाण
दत्ता कराळे यांच्या बदलीनंतर नाशिक परिक्षेत्रातील पोलीस प्रशासनात मोठ्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे. आगामी काळात अशोक खरात प्रकरणातील तपास अधिक वेगाने होणार का, तसेच संबंधितांवर आणखी कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बदली नाही, थेट निलंबन करा!” — कराळे प्रकरणावर नागरिक आक्रमक
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. खरातच्या कार्यक्रमातील फोटो, व्हिडीओ आणि भाषणामुळे पोलीस यंत्रणेची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
दमानिया यांनी उपस्थित केलेल्या आरोपांनुसार, आयजी दर्जाचा अधिकारी असताना कराळे हे अशोक खरातच्या कार्यक्रमात उपस्थित का होते? त्यांनी तेथे भाषण का दिले? असा सवाल उपस्थित करण्यात आला. सामान्य नागरिकांमध्ये त्यामुळे खरातविषयी विश्वास निर्माण झाला, अशी टीकाही करण्यात आली.
याशिवाय खरात आणि कराळे यांच्यात तब्बल १८ फोन कॉल झाल्याचा दावा करत या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी याबाबत उत्तर द्यावे, असेही दमानिया यांनी म्हटले होते.
दरम्यान, राज्य सरकारने दत्ता कराळे यांची बदली केल्यानंतर दमानिया यांनी निर्णयाचे स्वागत केले. मात्र नागरिकांमधून आता “फक्त बदली नको, तर निलंबन करून चौकशी व्हावी” अशी जोरदार मागणी होत आहे.

