
अहिल्यानगर : वन विभागाच्या जिल्हा कार्यालयात घडलेल्या धक्कादायक चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक करून मोठे यश मिळवले आहे. या घटनेत आरोपींनी चक्क रात्रपाळीवर असलेल्या वनमजुराला झाडाला बांधून सुमारे 20 हजार रुपये किमतीची दोन चंदनाची झाडे तोडून चोरी केली होती.
सविस्तर माहिती अशी की, दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी पहाटे सुमारे 2.15 वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर येथील वन विभागीय कार्यालयात ही घटना घडली. रात्रपाळीवर तैनात असलेले वनमजूर रमेश शेळके (वय 58, रा. गुंडेगाव) यांना चार अज्ञात आरोपींनी अशोकाच्या झाडाला बांधून ठेवले आणि सहाय्यक वन संरक्षक यांच्या निवासस्थानाजवळील दोन चंदनाची झाडे तोडून नेली.
या प्रकरणी अहिल्यानगर कॅम्प पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला.
पोनि किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक माहिती व गुप्त बातम्यांच्या आधारे छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील विविध भागात सलग 5 दिवस शोधमोहीम राबवली. या मोहिमेत दोन आरोपी – मसीद नसीब गोलवाल (वय 24) व शाहीदखा अलीखा कलेसे (वय 26) यांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत आरोपींनी त्यांच्या आणखी दोन साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली असून असलमखा पठाण व नसीबखा जोनवाल हे दोघे सध्या फरार आहेत. विशेष म्हणजे, या आरोपींनी औरंगाबाद खंडपीठ परिसरातूनही चंदन चोरी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलीसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली CBZ मोटारसायकल (MH 28 W 9738) जप्त केली आहे. अटक आरोपींना पुढील तपासासाठी अहिल्यानगर कॅम्प पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
👉 या कारवाईमुळे सरकारी ठिकाणांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, वन विभागाच्या सुरक्षेत मोठी पोकळी उघड झाल्याची चर्चा सुरू आहे.

