शिर्डी : शिर्डी-नगर-मनमाड महामार्गालगत नव्याने विकसित करण्यात आलेल्या रिंगरोड परिसरात एका ३६ वर्षीय तरुणाने बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला असून, घटनेचा सखोल तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डी शहरालगत हॉटेल शांतीकमल शेजारून जाणाऱ्या नवीन रिंगरोडवर स्वर्गीय दिनूमामा कोते यांच्या बंगल्यासमोरील शेतातील बाभळीच्या झाडाला एका तरुणाने गळफास घेतल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ शिर्डी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता, मृताच्या खिशात मिळालेल्या आधारकार्डावरून त्याची ओळख संदीप समाधान घागे (वय ३६), रा. मदाखेड खुर्द, ता./जि. बुलढाणा अशी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संबंधित तरुण शिर्डीत नेमका कोणत्या कारणासाठी आला होता, तो येथे किती दिवसांपासून होता आणि त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचा तपास सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी प्रदीप बोऱ्हाडे, किरण माळी, प्रल्हादसिंग सुंदर्डे तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रियेसाठी रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. अचानक घडलेल्या या घटनेमुळे रिंगरोड परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आत्महत्येमागे वैयक्तिक कारण, कौटुंबिक वाद, आर्थिक अडचण की अन्य काही कारण आहे, याचा सर्व बाजूंनी तपास शिर्डी पोलीस करीत आहेत.
दरम्यान, शवविच्छेदन अहवाल आणि नातेवाईकांच्या जबाबानंतर आत्महत्येमागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता असून, पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
