शिर्डी येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या निमगाव कोऱ्हाळे गावातील श्रद्धा सबुरी सहकारी पतसंस्थेच्या तब्बल ४१ कोटी ९७ लाख १७ हजार ४० रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर सहकार खात्याने जबाबदारी निश्चित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
शिर्डी पोलिसांनी या प्रकरणात अध्यक्ष राजेंद्र गाडेकर, उपाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर आणि व्यवस्थापक अनिल खैरे या तिघांना अटक केली आहे. पतसंस्थेचे एकूण १९ संचालक व आठ कर्मचारी यांच्यावर भारतीय सहकारी कायद्यातील कलम ८८ अन्वये कारवाई प्रस्तावित असून, त्यांच्या स्थावर मालमत्तांवर बोजा चढवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
या प्रकरणातील काही संचालक आता हयात नसल्याने त्यांच्या वारसदारांच्या मालमत्तांवरही बोजा चढवण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती राहाता येथील सहकार खात्याच्या सूत्रांकडून मिळाली आहे. संस्थेच्या हिशोबात अनेक गंभीर अनियमितता आढळून आल्या आहेत. संस्थेच्या खात्यात रोख रक्कम केवळ ४ लाख ६२ हजार ९७६ रुपये होती,
परंतु तीही सध्या शिल्लक नाही. २८ लोकांना कॅश क्रेडिट कर्ज देण्यात आले असून त्यातून २ कोटी ३८ लाख ११ हजार रुपये येणे बाकी आहे. हाय परचेस कर्जाच्या स्वरूपात ८६ लोकांना कर्ज दिले गेले असून, १ कोटी ९४ लाख ८८९५ रुपये येणे बाकी आहे.
४३ कोटी दोन लाख २८ हजार ७२० रुपये येणे अपेक्षित आहे. दीर्घ मुदत ठेव स्वरूपात १७२ लोकांनी १ कोटी १४ लाख ५८ हजार ९९३ रुपये ठेवले होते, तर अल्प मुदत ठेवी पोटी १३४ ठेवीदारांनी ७० लाख ५५ हजार ८४५ रुपयांच्या ठेवी केल्या होत्या. ज्ञानेश्वर दैनिक मंगल ठेव योजनेत १५३२ ठेवीदारांनी १ कोटी ७१ लाख ८१ हजार ४०१ रुपयांच्या अनामक ठेवी संस्थेकडे ठेवल्या होत्या.
कर्ज वितरण करताना कर्ज अनामत रक्कम म्हणून ३३८ जणांकडून ४३ लाख ५६ हजार २९० रुपये कपात करण्यात आले होते, पण ती रक्कमही गायब आहे. मध्यम मुदत ठेवी पोटी ६७३७ ठेवीदारांनी ४२ कोटी ७६ लाख २२ हजार ६८३ रुपयांच्या ठेवी केल्या होत्या. सेव्हिग खात्यात २५१४ खातेदारांचे ६ कोटी ३१ लाख ४७ हजार १२१ रुपये असणे अपेक्षित होते, मात्र तेही गायब आहेत.
संस्थेच्या कोणत्याही खात्यात कोणतीही शिल्लक रक्कम नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या सगळ्या प्रकारात काही ठराविक व्यक्तींमुळे दोष नसताना काही निरपराध संचालक अडचणीत आले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. संस्थेचा कर्मचारी नितीन महाजन सध्या फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
गुन्हा दाखल होऊन एक महिना उलटून गेला असतानाही ठेवीदारांच्या उलटून पैशांचे काय होणार, याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. सहकार खात्याकडून संबंधित कालावधीतील आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू असून, नेमका गैरव्यवहार कधी झाला याचा शोध घेण्यात येत आहे. गैरव्यवहारात कोण किती जबाबदार आहे,
याचा सखोल अभ्यास करून संबंधितांची जबाबदारी निश्चित केली जाणार असून, त्यानंतरच वसुलीसाठी पुढील पावले उचलली जातील. पोलिसांनी अटकेत असलेल्या तिघांची कसून चौकशी सुरू केली असून, उर्वरित संचालक व कर्मचाऱ्यांची जबाबदारी ठरवण्यासाठी सहकार खाते प्रक्रिया गतिमान करत आहे.