
शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथे रात्री साई संस्थांनच्या गावकरी गेटमधून मंदिरात सोडावे म्हणून आरडाओरड धक्काबुक्की करत सरकारी काम करताना अडथळा आणल्याची फिर्याद महाराष्ट्र सुरक्षा बल सुरक्षा रक्षक संस्थांचे प्रथमेश राजेंद्र आहेर यांनी शिर्डीतील अनुप गणपतराव गोंदकर यांच्या विरोधात शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल केली आहे.

या फिर्यादी त्यांनी म्हटले आहे की,आम्ही डयूटीवर असतांना रात्री 00/55 वा. शिर्डी ग्रामस्थ अनूप गणपत गोंदकर हे गावकरी गेटला आले व मला मंदीरात जावू दया असे म्हणू लागले. आम्ही त्यांना सांगितले की, आता रात्रीचे 01/00 वाजत आले आहेत आणि मंदीर बंद आहे. ते दारूचे नशेत असल्याने काहीही बडबड करत होते. आम्ही त्यांना आत जावू देत नव्हतो तर, त्यांनी गेटसमोर त्यांचे अंगातील शर्ट आणि पेंट काढली.
बनियान व अंडरवियर वर ते गावकरी गेट ने बळजबरी आत जायू लागले, मी त्यांना अडवायचा प्रयत्न केला असता बगेज स्कॅनर जवळ त्यांनी मला धक्का देवून ते नंदी गेट जवळ गेले. ते खुप मोठ्याने आरडाओरड करत असल्याने त्या ठिकाणी रात्रगस्त कर्मचारी पंकज सगळे हे देखील आले.त्यानंतर अनूप गोंदकर हे शनिगेट येथे आले, त्या ठिकाणी दिव्यांग साईभक्तांकरीता देणेकरीता ठेवलेले बुंदीपाकीट चा प्लास्टीक बॉक्स जमिनीवर आदळून फेकून दिला त्यामूळे श्री साईबाबांचा पवित्र प्रसाद इतरत्र फेकला गेला.
आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होतो परंतु ते नशेत दिसत असल्याने आमचे काही ऐकत नव्हते. तेवढ्यात त्या ठिकाणी सुरक्षा अधिकारी सागर परदेशी तसेच सुरक्षा रक्षक विजय भोकरे, सुरक्षा सुपरवायझर भानुदास बबळे, सुरक्षा कर्मचारी राहूल नालकर, सुरक्षा कर्मचारी जालिंदर बोर्डे हे सर्व आले. शनिगेट रॅम्पवर ते ठिय्या मांडून मोठमोठयाने आरडाओरड करत होते. त्यांना आम्ही सर्वांनी बाहेर काढले.
अनुप गणपत गोंदकर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 132/ 296/ 2025 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणाची शिर्डीत उलट सुलट चर्चा सुरू असून अनुप गणपत गोंदकर हे रात्री दर्शनाला कशासाठी जातील? असा प्रश्न आहे. कारण ते गावातीलच एक नागरिक असून त्यांना साई दर्शनाची व मंदिराची वेळ माहिती आहे. तसेच ते गावकरी गेटने थेट शनी मंदिरापर्यंत जाईपर्यंत सुरक्षारक्षक काय करत होते,

हाही मोठा प्रश्न आहे. यासंदर्भात अनेक सवाल ग्रामस्थांकडून आता उठवले जात आहे. एका व्यक्तीला तेथे चार-पाच जमा झालेले सुरक्षा रक्षक मज्जाव का करू शकले नाही, व नशेत होते तर तात्काळ मेडिकल का केली गेली नाही, हा गुन्हा आकासापोटी तर दाखल केले गेलेला नाहीना असाही प्रश्न समोर येत असल्याचे येथील ग्रामस्थांकडून आपापसात बोलले जात आहे. या घटने संदर्भात शिर्डीत सध्या अशी उलट सुलट चर्चा सुरू आहे.