
शिर्डी : शिर्डी शहरातील ट्रॅव्हल्स व्यावसायिक योगेश तिया यांनी दिलेल्या तक्रारीवरून मैत्री, आर्थिक व्यवहार, वैयक्तिक संबंध आणि कथित ब्लॅकमेलिंगचे प्रकरण समोर आले असून या प्रकरणाची सध्या जिल्हाभरात जोरदार चर्चा सुरू आहे. मुंबई येथे दिलेली तक्रार झिरो क्रमांकाने वर्ग होऊन ती पुढील कारवाईसाठी शिर्डी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, सन २०२३ ते २०२४ दरम्यान योगेश तिया यांची मुंबई येथील शेलार आडनावाच्या एका महिलेशी ओळख झाली होती. पुढे या ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाले आणि दोघांमध्ये परस्पर संमतीने वैयक्तिक तसेच शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्याचा उल्लेख स्वतः तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, संबंधित महिलेच्या पतीच्या निधनानंतर तिने आर्थिक अडचणी असल्याचे सांगून मदत मागितली. तिच्या परिस्थितीवर विश्वास ठेवून सन २०२४ ते २०२६ या कालावधीत ऑनलाइन व रोख स्वरूपात तब्बल १० ते १२ लाख रुपयांची आर्थिक मदत केल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. ही रक्कम नंतर परत केली जाईल, असे आश्वासन महिलेकडून देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मात्र, महिलेची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आणि तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यानंतर आर्थिक मदत थांबविण्यात आली. यानंतरच दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि संबंधित महिलेकडून कथित ब्लॅकमेलिंग सुरू झाल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरित!
या संपूर्ण प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित होत असून त्याची उत्तरे तपासातूनच समोर येणार आहेत.
तक्रार मुंबई येथे दाखल करण्यात आली, मात्र गुन्हा शिर्डी पोलीस ठाण्यात नोंदविण्याची नेमकी कारणे काय?
तक्रारदार शिर्डी येथील रहिवासी असल्याचा स्पष्ट उल्लेख फिर्यादीत का करण्यात आला नाही?
कथित घटना नेमक्या कोणत्या ठिकाणी घडल्या आणि त्या अनुषंगाने अधिकार क्षेत्राचा प्रश्न निर्माण होतो का?
तक्रारदाराने स्वतः तक्रारीत परस्पर संमतीने संबंध असल्याचे नमूद केले असताना पुढे नेमका वाद कशामुळे निर्माण झाला?
संबंधित महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारदाराने केला असला, तरी त्यामागील कारणे काय होती?
आर्थिक व्यवहारांचे पुरावे, बँक व्यवहार किंवा अन्य कागदपत्रे तपासात काय समोर आणतात?
2024 मध्ये महिलेच्या पतीचे निधन कसे झाले व कशामुळे झाले याचाही फिर्यादीत उल्लेख नाही
सध्या या प्रकरणाबाबत विविध स्तरावर चर्चा सुरू असली, तरी सत्य नेमके काय आहे, हे पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सर्व संबंधित बाबींची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

