शिर्डी | प्रतिनिधी
साई बाबा एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीत ‘साई ज्योत’चा मुद्दा आता केवळ आर्थिक प्रश्न राहिलेला नसून, तो थेट सत्तासंघर्षाच्या केंद्रस्थानी पोहोचला आहे. विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना चेअरमन विठ्ठल पवार यांनी एकापाठोपाठ एक गंभीर आरोप करत विरोधकांच्या कथित आर्थिक हितसंबंधांवरच बोट ठेवले. पवार यांच्या आक्रमक वक्तव्यामुळे सोसायटीतील राजकारणाला अक्षरशः ‘साई ज्योत’ची ठिणगी पडली आहे.
“विरोधकांची पाकिटे बंद झाल्यामुळेच त्यांचा जळफळाट सुरू आहे. साई ज्योतच्या चुलीत पेटलेला धूर त्यांच्या डोळ्यात गेल्यामुळे त्यांना रात्रंदिवस एक दिसत आहे. सकाळी उठून त्यांनी आरशात आपले डोळे पाहावेत,” अशा बोचऱ्या शब्दांत पवार यांनी विरोधकांना लक्ष्य केले.
‘निकृष्ट मालाची दुकानदारी बंद केली’
सोसायटीच्या कारभारात आपण हस्तक्षेप केल्यानंतर कथित गैरप्रकारांना आळा बसल्याचा दावा पवार यांनी केला.
“विरोधकांच्या चोऱ्या मी पूर्णपणे बंद केल्या आहेत. त्यांच्या हस्तकांमार्फत सोसायटीला निकृष्ट दर्जाचा माल पुरवला जात होता. मी तो माल स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांची दुकानदारी बंद पडली,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
त्यामुळेच आता ‘साई ज्योत’चा मुद्दा पुढे करून आपल्यावर आरोप केले जात असल्याचा दावा पवार यांनी केला.
“त्यांच्या हस्तकांचा माल पुन्हा सोसायटीने खरेदी करावा, यासाठीच त्यांना साई ज्योतचा एवढा पुळका आला आहे. हा साई ज्योतचा प्रश्न नाही; हा त्यांच्या आर्थिक हितसंबंधांचा प्रश्न आहे,” असा थेट हल्ला त्यांनी चढवला.
ग्रोमोअर-सिस्पेचा ‘हिशोब’ कुठे?
सोसायटीच्या काही गुंतवणुकींचा संदर्भ देत पवार यांनी विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
“ग्रोमोअर, सिस्पे यांसारख्या कंपन्यांमध्ये कोणत्या पैशांची गुंतवणूक केली आहे, हे आधी सभासदांसमोर आणि जनतेसमोर दाखवा. सोसायटीला लुटून मिळवलेल्या पैशातून ही गुंतवणूक केली आहे का? हिशोब द्या,” अशी मागणी त्यांनी केली.
हे आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने संबंधित गुंतवणुकीची कागदपत्रे, लेखापरीक्षण अहवाल आणि अधिकृत नोंदी यामुळेच वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकते.
‘सत्ता तुमची होती, मग माझे काय वाकडे केले?’
विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पवार यांनी थेट आव्हान दिले.
“तुमची सत्ता असताना मी साई ज्योतला आव्हान दिले होते. त्यावेळी तुम्हीच चेअरमन होता. मग माझे काय वाकडे करू शकला नाहीत?” असा सवाल करत त्यांनी जुन्या कारभाराचा हिशोब काढण्याचे आव्हान दिले.
भाड्याचे पैसेही नाहीत?
विरोधकांच्या आर्थिक परिस्थितीवरही पवार यांनी निशाणा साधला.
“ज्या कार्यालयातून ते कारभार चालवतात, त्या कार्यालयाचे भाडे भरण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नाहीत. ही परिस्थिती त्यांच्याच कार्यकर्त्यांनी माध्यमांसमोर सांगितली आहे,” असा दावा त्यांनी केला.
‘वर्षभर थांबा… डबा घेऊन फिरण्याची वेळ येईल!’
वक्तव्याच्या शेवटी पवार यांनी विरोधकांना दिलेला इशारा चर्चेचा विषय ठरला आहे.
“अजून वर्षभर थांबा. तुम्हाला याच साई ज्योतसमोर हातात डबा घेऊन फिरण्याची वेळ येईल. अशी वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून संयम ठेवा; कारण प्रत्येकाची वेळ येत असते,” असा इशारा पवार यांनी दिला.
: ‘साई ज्योत’चा धूर कुणाच्या डोळ्यात?
सोसायटीतील सध्याच्या संघर्षात आरोपांची मालिका सुरू झाली आहे. एकीकडे ‘साई ज्योत’च्या कामावरून विरोधक सवाल उपस्थित करीत आहेत, तर दुसरीकडे चेअरमन पवार यांनी थेट कथित आर्थिक हितसंबंध, निकृष्ट मालाची खरेदी आणि गुंतवणुकीच्या हिशोबाचा मुद्दा पुढे आणला आहे. त्यामुळे आता आरोप-प्रत्यारोपांपलीकडे जाऊन सोसायटीचा संपूर्ण कारभार, गुंतवणूक, खरेदी प्रक्रिया आणि लेखापरीक्षणाची कागदपत्रे सभासदांसमोर येणार का? हा खरा सवाल आहे.